मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पाटील यांच्या पत्नी सुमन यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. भाजपाने या मतदारसंघात उमेदवार द्यायचा किंवा कसे याबाबत अद्याप निर्णय घेतला नसला तरी ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मात्र शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. नारायण राणे अथवा कृपाशंकर सिंह ही निवडणूक लढवणार आहेत.विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांना भाजपाने लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदी यांनी पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयाप्रति सर्वांनाच सहानुभूती असल्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुमन यांनाच उमेदवारी देऊ केली तर त्यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार असणार नाही, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार प्रीतम मुंडे यांची लोकसभेवर बिनविरोध निवड झाली. आता भाजपाने मोठे मन दाखवून पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. आर. आर. पाटील यांचे राजकीय विरोधक संजयकाका पाटील हे भाजपात असून, या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा किंवा कसे याबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या मतदारसंघात त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यायची किंवा कसे यावर शिवसेनेत चर्चा सुरू आहे. विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांचे नाव चर्चेत असून, याची धुरा त्यांच्याच खांद्यावर द्यायची असल्याने ते उमेदवारी स्वीकारण्यास उत्सुक नाहीत.
तासगाव बिनविरोध, वांद्रे पूर्वमध्ये लढत अटळ
By admin | Published: March 13, 2015 1:36 AM