सांगली : राज्यातील प्रश्नांची जाण नसलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचे नेतृत्व करू शकतात का? एकही संस्था त्यांनी उभी केलेली नाही. सत्ता असूनही मुंबई महापालिकेची त्यांनी वाट लावली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात केली.महायुतीचे खासदार आता आया-बहिणींचा अवमान करीत आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका मुस्लिम कर्मचाऱ्याचा उपवास मोडण्याचे कृत्य त्यांनी केले. केंद्र्रात सत्ता आली म्हणून त्यांना इतकी मस्ती आली आहे का?, असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.राज्याला व देशाला ज्यांनी सहकाराचा मंत्र दिला, त्या वसंतदादा पाटील यांच्या नावाचाच कारखाना बंद पाडण्यात आला. जिल्ह्यातील कारखान्यांचे ज्यांनी वाटोळे केले, तेच आता दुसऱ्या पक्षात चालले आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी वसंतदादांच्या वारसदारांवर केली.राष्ट्रवादी पक्ष सोडणारे संधी मिळाली नसल्याची टीका करत आहेत. वास्तविक प्रत्येकालाच पक्षात संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात गेल्या पंधरा वर्षात सर्वाधिक पदे सांगलीला मिळाली. आता जिल्ह्यातील असे नेते ज्या पक्षांमध्ये जाऊ पहात आहेत, त्या पक्षांच्या निर्णयप्रक्रियेत पश्चिम महाराष्ट्रातील एकही नेता नाही. उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्या हातीच पक्षाच्या दोऱ्या आहेत. त्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्राला कितपत न्याय देतील, याबाबत शंका वाटते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
जाण नसलेले ठाकरे बंधू राज्याचे नेतृत्व कसे करणार?
By admin | Published: August 12, 2014 2:29 AM