ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ - गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलीस तपास करत असून सनातन संस्थेला राज्य सरकारनं क्लीन चीट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे स्पष्ट मत कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री असलेले भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पोलीसांनी पानसरे हत्याप्रकरणी कॉल रेकॉर्ड्सवरून व तांत्रिक सर्वेक्षणाच्या आधारे समीर गायकवाड या संशयिताला अटक केली आहे. त्याखेरीज आणखी चारजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. समीर सनातनचा पूर्णवेळ साधक असून त्याच्यामागे सनातन संस्था ठामपणे उभी राहिली असून त्याला गोवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पोलीस योग्य प्रकारे खुनाचा तपास करीत असून सनातनला पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हटले आहे.
या संदर्भात विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांचे आरोप पुर्णत: निराधार असून ती त्यांची जुनी सवय असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे. पोलिस दलाने संयमाने व कौशल्याने या प्रकरणी तपास सुरु ठेवला असुन ते अभिनंदनास पात्र असल्याचेही पाटील म्हणाले. शिवाजी विघापीठातील कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.