उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने भूजल पातळीही खालावत आहे. परिणामी, जूनपर्यंत जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. मोठ्या शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या हतनूर व वाघूर या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी अनुक्रमे ८६.५० तर वाघूरमध्ये ८१.४४ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांपैकी गिरणा धरणात मात्र अतिशय कमी म्हणजे १६ टक्के पाणी आहे. एप्रिल ते जून हा टंचाईचा शेवटचा टप्पा. या टप्प्यात जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. तसेच १५०१पैकी ७०२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित आहेत. त्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक ३३ गावांचा समावेश आहे. यासह अमळनेर २०, भडगाव २, भुसावळ, बोदवड, पाचोरा प्रत्येकी ६, चाळीसगाव ५, चोपडा १०, धरणगाव २७, एरंडोल १२, जळगाव ७, मुक्ताईनगर ८, पारोळा, रावेर प्रत्येकी ९ आणि यावल ३ अशा १६३ गावांना पाणीटंचाईची झळ बसू शकते. १४१ गावांची भिस्त टँकरवर!अहमदनगर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांतील भूजलपातळी कमालीची खालावली आहे़ पाणीपातळी खालावत असल्याने टँकरची संख्या वाढत असून, जिल्ह्यातील १४१ गावे टँकरवर अवलंबून आहेत़ उन्हं वाढू लागल्याने पाणीसाठ्यात घट होऊन सध्या जिल्ह्यात अवघा १८ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे जिल्ह्याला येत्या मे व जूनमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत़ दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टँकरने शंभरी पार केली़ सध्या १९१ टँकर्सद्वारे १४१ गावे आणि ५९१ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे़ गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील टँकरची संख्या ३६९ होती़ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहता तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे़ त्यामुळे या सात तालुक्यांना येत्या मेमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ जिल्ह्यात १२ प्रकल्प आहेत़ मुळा व भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तने सोडण्यात आली़ सध्या जिल्ह्यात एकूण १८ हजार ५०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे़ मुळा धरणाने तळ गाठल्याने या धरणातून आवर्तन सोडणे अशक्य असल्याने लाभक्षेत्रातील तालुक्यांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे़
जळगावात १६३ गावांमध्ये टंचाई
By admin | Published: April 13, 2015 5:10 AM