मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे कामाची तीन टप्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येत्या ३१ मार्चपर्यंत ८९ कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत काम पूर्र्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. कशेडी घाटात सहा पदरी भुयारी रस्ता बांधण्याबाबतचा प्रश्न सदस्य सुनिल प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, सर्वपक्षीय आमदारांसह या कामाची पाहणी झाली आहे. भूसंपादनातील अडचणींमुळे काही ठिकाणी काम रखडले आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी सहकार्य करायला हवे. या महामार्गावरील अपूर्ण कामांची यादी केली असून ८९ कामे ३१मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महामार्गावरील पनवेल-इंदापूर रस्त्याचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कंत्राटदार कंपनी सुप्रीम कंस्ट्रक्शनचे काम समाधानकारक नसल्याने करार रद्द करण्याची मागणी केली. मात्र, करार रद्द केल्यास पुन्हा एकदा निविदा काढावी लागेल, असे पाटील म्हणाले.
तीन टप्प्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणार
By admin | Published: March 12, 2015 1:32 AM