आगा खान पठाण, अकोलारस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पाच महिला शेतमजुरांना भरधाव ट्रेलरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी ८़ ४५ वाजता कोळंबी येथे घडली. या अपघातात पाच महिलांसह पाचवर्षीय चिमुकल्याचाही मृत्यू झाला़ अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर तीन तास रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर दुपारी १२़३०च्या सुमारास महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.मृतांमध्ये ताई इंगोले (२५), गौरव इंगोले (५), रेखा तळोकार (३५), सुनीता देवके (३५), नंदा गाडगे (३५) आणि विजया मानकर (१८) यांचा समावेश आहे़ घटनेनंतर ट्रेलरचालक अमरजितकुमार शिवपारससिंग यादव (२७) याला पोलिसांनी अटक केली़छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून विजेचे खांब घेऊन ट्रेलर अकोल्याकडे येत होता. मूर्तिजापूर सोडल्यानंतर कोळंबीनजीक चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी पाच महिला शेतमजूर रस्त्याच्या कडेने जात होत्या. त्यापैकी एकीजवळ तिचा पाच वर्षांचा मुलगाही होता. सहाही जण महामार्गाच्या उजव्या बाजूने जात असताना ट्रेलरने मागून जोरदार धडक देऊन त्यांना अक्षरश: फरफटत नेले. यातच महिलांसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)
ट्रेलरने पाच महिलांना चिरडले
By admin | Published: August 13, 2014 2:26 AM