सुनील कच्छवे,
औरंगाबाद- दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांवर यंदा बियाणांच्या दरवाढीचेही संकट कोसळले आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) यंदा तूर, मूग, उडीद, सोयाबीन या कडधान्यांसह ज्वारी आणि बाजरीच्या बियाणांच्या किमतीतही जबर वाढ केली आहे. तुरीचे बियाणे तब्बल ७५ टक्क्यांनी तर उडदाचे बियाणे दुपटीने महागले आहे.बियाणे दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाढणार आहे. खरिपाच्या तोंडावर महाबीजचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे; परंतु दरवाढीमुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे धक्काच बसला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तुरीच्या दरात सरासरी ७५, ज्वारी ३५, बाजरी ५, मुग ५० तर सोयाबीनच्या दरात ५ टक्केवाढ झाली आहे.राज्य सरकारकडून कडधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे मात्र, कडधान्यांच्या किमती वाढल्या आहेत. बियाणे महामंडळ हा राज्य सरकारचाच उपक्रम आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या किमतीत वाढ झाल्यामुुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मराठवाड्यात १० लाख हेक्टर क्षेत्रमराठवाड्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४९ लाख ९ हजार हेक्टर इतके आहे. त्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र १० लाख ६४ हजार हेक्टर आहे. कडधान्य पिकांमध्ये मराठवाड्यात प्रामुख्याने तूर, मूग आणि उडदाचे प्रमाण अधिक आहे. कृषी विभागानुसार यंदा तुरीचे क्षेत्र ५ लाख ८७ हजार हेक्टर, मुगाचे २ लाख १८ हजार आणि उडदाचे क्षेत्र एक लाख ९९ हजारहेक्टर प्रस्तावित करण्यात आलेले आहे.खर्च वाढल्यामुळे दरवाढ बियाणे निर्मितीसाठी महामंडळ शेतकऱ्यांकडूनच चांगल्या प्रतीच्या मालाची खरेदी करते. त्याकरिता शेतकऱ्यांना बाजारभाव आणि त्यावर २५ टक्के बोनस दिला जातो. त्यानंतर या मालावर प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक, चाळणी, गाळणी, पॅकिंग या सर्वांचा खर्च काढून बियाणांची किंमत निश्चित केली जाते. हा सर्व खर्च वाढल्यामुळे यंदा बियाणांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. - जगदीश गिरी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज