ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - राज्यातील विद्यमान राज्यकर्ते नामर्द आणि शेळपट असल्यानेच बेळगावमधील सीमावासीयांना कर्नाटक सरकारचा अन्याय सोसावा लागतो अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र सदनातील चपाती प्रकरणावरुन लोकसभेत निवेदन करुन 'कार्यतत्परता' दाखवणा-या केंद्र सरकारने कानडी दहशतवादावरही कार्यतत्परता दाखवून त्यावर लगाम घालावा अशी मागणीही ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे.
येळ्ळुरमधील महाराष्ट्र राज्याचा फलक कर्नाटक पोलिसांनी उद्धवस्त केला होता. तसेच फलक लावणा-या येळ्ळुरमधील ग्रामस्थांवर अमानूष लाठीमार करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सीमावासीयांच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. यात उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र - कर्नाटक सीमारेषेवरील मराठी कुटुंबांचा 'रोजा' नसला तरी त्यांना दररोज कानडी अत्याचार सोसावा लागतो. मात्र दुर्दैवाने याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. बेळगावात मराठी अस्मितेची पुसटशी खूणही कर्नाटकच्या मस्तवाल सरकारला नको असून या कर्नाटकी अरेरावीला महाराष्ट्राच्या मर्द जनतेने उत्तर दिल्यास काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा इशाराच त्यांनी दिला आहे.
मुंबईत कर्नाटक संघ आणि कर्नाटक भवनाच्या इमारती दिमाखात उभ्या असतानाच कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचा फलकही चालत नाही असे ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. राज्यातील जनतेने मुंबईत हॉटेल्स, उद्योग चालवणा-या कानडी मंडळींच्या केसालाही धक्का लावला नसतानाच कर्नाटकात मराठी भाषिकांना पोलिस पायदळी तुडवतात. हे कृत्य हाफीज सईदच्या दहशतवादाप्रमाणे असून न्यायप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व कणखर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणात सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा असे ठाकरेंनी म्हटले आहे.