VBA Prakash Ambedkar News: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. हिंसाचार करणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड करुन ती पेटवून दिली होती. त्यामुळे प्रशासनाला अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज समाजात द्वेष पसरवण्याचं आणि विभाजन करण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात आहे. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. नागपूरसह राज्यभरातील लोकांना माझे आवाहन आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता कायम ठेवा, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे.
औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार
ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच अयोध्याचा आता राजकीय फायदा नाही. औरंगजेबाची मजार यामध्ये राजकीय लाभ आहे, त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणे हा त्याच्यातील कारभार राहणार, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कारवाई व्हायची असेल तर दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही. तिला दोन हात लागतात. अप्रिय गोष्ट जरी असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्रात १९९२ साली जे यूपीत झाले, ते होऊ नये. एवढी खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अन्यथा औरंगजेबाची मजार हे राज्याच्या बाहेरची लोक एक राष्ट्रीय मुद्दा करू पाहात आहेत, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.