नितीन गव्हाळे / ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 31 - पोलीस केवळ गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे, गुन्ह्यांचा तपास करण्याचेच काम करू शकतात असे नाही. खाकी वर्दीत दडलेला अधिकारी, कर्मचारी समाजामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडू आणु शकतो. हेच एमआयडीसी पोलिसांनी आपल्या कृतीतून मांडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या परिसरातील ओसाड, खडकाळ जमिनीचे शेतीत रूपांतर करून त्यावर पिक घेण्याचा आगळावेगळा प्रयोग एमआयडीसी पोलिसांनी केला आहे.
पोलीस ठाणे म्हटले की, तेथे गुन्हा दाखल होतो, गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम होते. हेच डोळ्यांसमोर येते. परंतु पोलीस ठाण्याच्या माध्यामातून काही सकारात्मक कार्य सुद्धा केले जातात. याची क्वचित उदाहरणे पाहायला मिळतात. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या निवासस्थानांलगत दोन, अडीच एक ओसाड जमिन होती. या दोन्ही अधिका-यांनी या ओसाड जमिनीची मशागत करून त्यावर नंदनवन फुलविले. यातूनच प्रेरणा घेत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनीही पोलीस ठाण्यालगतच्या एकरभर ओसाड, खडकाळ जमिनीची मशागत करून तिचे शेतीत रूपांतर केले.
१५ जानेवारी २0१६ रोजी सिव्हील लाइन पोलीस ठाण्याचे विभाजन करून एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी याठिकाणी पोलीस चौकी होती आणि परिसर काटेरी झाडाझुडूपांनी वेढलेला होता. पहिले ठाणेदार म्हणून सुत्रे स्विकारल्यानंतर खंडारे यांनी परिसर स्वच्छ केला. खंडारे यांच्याकडे शेती असल्याने त्यांना शेतीकामाची आवड आहे. त्यांनी कर्मचाºयांच्या सहकार्याने ओसाड जमिनीची मशागत केली आणि काळीशार जमीन तयार झाली. या जमिनीवर ठाणेदार शिरीष खंडारे यांच्यासह त्यांच्या पोलीस कर्मचाºयांनी मेहनती हरभरा व तुरीची लागवड केली. सध्या हरभरा व तुरीचे पिक फुलांनी चांगलेच बहरले आहे. ओसाड जमिनीचा सदुपयोग व्हावा आणि पोलीस कर्मचाºयांना विरंगुळा म्हणून शेतात फेरफटका मारता यावा आणि यातून त्यांना मन:शांती लाभावी. या उद्देशाने पोलीस ठाण्यात बाग फुलविण्यात आली. एमआयडीसी पोलिसांचा उपक्रम प्रेरणादायी असून, नवीन वर्षांमध्ये इतर पोलीस ठाण्यांनी सुद्धा त्यातून आदर्श घ्यावा. अशी अपेक्षा करूया...