ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 13 - चलनातून हजार व पाचशेच्या जुन्या नोटा एका फटक्यात बाद झाल्यानंतर निर्माण झालेल्या कृत्रिम आर्थिक पोकळीचा परिणाम व्यापार-व्यवसायावर दिसून येत आहे. अकोला शहरातील सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाले असताना रविवारचा आठवडी बाजारही त्यातून सुटला नाही. सुट्या पैशांच्या अभावी ग्राहकांनी बाजाराकडे पाठ केली. त्यामुळे बाजारातील भाज्या, फळं व किराणा व्यावसायिकांचा धंदा निम्यावर आल्याचे चित्र रविवारी दिसून आले.शहरात जनता बाजार, जुना भाजी बाजार, जठारपेठ चौक, सिंधी कॅम्प यासह इतर ठिकाणी दररोज भाजी बाजार भरतो. परंतु रविवारी जनता बाजारात आठवडी बाजार भरतो. या बाजारात शहरासह जिल्हाभरातील ग्राहकांची मोठी गर्दी होऊन लाखो रुपयांची उलाढाल होते. चलनातून हजार व पाचशेच्या नोटा बाद झाल्यानंतर नागरिकांकडे पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध झालेल्या नसतानाच शंभर व पन्नासच्या नोटांचाही मोठा तुटवडा निर्माण झाल्याचा परिणाम रविवारच्या बाजारावर दिसून आला. एरवी ग्राहकांनी फुलून जाणाऱ्या या बाजारात गत आठवड्याच्या तुलनेत ग्राहकांची संख्या खुपच कमी होती. सध्या हिवाळा असल्यामुळे भाज्यांची आवक वाढल्याने किंमती आटोक्यात असल्यानंतरही केवळ सुट्या पैशांअभावी ग्राहकांकडून भाज्यांना उठाव नसल्याने दररोज होणारा ८ ते १० हजारांचा धंदा आता केवळ ४ ते ६ हजार रुपयांपर्यंत घसरल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
(व्हिडीओ- प्रवीण ठाकरे )