कल्याण : ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाडेघर परिसरातील आनंदसागर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला आहे. सोसायटीच्या विकासकाने खतनिर्मितीचे मशीन खरेदी केली आहे. त्यात निर्माण होणारे खत तेथील उद्यानासाठी वापरले जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर केडीएमसीने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबरोबरच ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करणे यावर प्रामुख्याने भर दिला आहे. याअनुषंगाने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनाही आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद देताना आनंदसागर सोसायटीने ओल्या कच-यातून खतनिर्मितीचा प्रकल्प राबविला आहे. या सोसायटीतील पाच इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात ७० सदनिका आहेत. सध्या त्यात ५० कुटुंबे वास्तव्याला आले आहेत. प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून १० किलोच्या आसपास ओला कचरा गोळा होत आहे. शनिवार, ७ मे पासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी लागणारे मशीन विकासकाने खरेदी केली आहे. (प्रतिनिधी)।कचऱ्याचे वर्गीकरण काळाची गरजकेडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे सल्लागार श्रीकृष्ण भागवत यांनीही या सोसायटीला भेट देत तेथील सदस्यांना मार्गदर्शन केले. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. सोसायटीचा होणार सत्कारआपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे असे प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटींचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर केली होती. त्यानुसार संबंधित सोसायटीतील सदस्यांचा महापौर दालनात सत्कार करण्यात येणार असल्याचे देवळेकरांनी स्पष्ट केले.
ओल्या कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती
By admin | Published: May 19, 2016 3:57 AM