शहाजी फुरडे-पाटील,
बार्शी-दुष्काळग्रस्तांचा होणारी होरपळ लक्षात घेऊन येथील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या बार्शीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३ गावांची तहान त्यांच्या या उपक्रमाने भागवली जाते. दुष्काळामुळे समितीने यंदा महावीर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली. उत्सवातील रक्कम जलयुक्त शिवार अथवा टँकरसाठी देण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित समाजबांधवांनी पाण्याचे टँकर सुरू करण्याचा निश्चिय केला व त्याच बैठकीत २०० टँकर खेपांची रक्कम जमा झाली. भगवान महावीर यांच्या जयंतीदिवशी प. पू. साध्वीजी प्रशमरसाश्रीजी यांच्या उपस्थितीत तत्काळ वाणेवाडीला पहिला टँकर पाठविला गेला.जैन समाजाने टँकर सुरू केल्याचे कळताच गावागावांतून टँकर मागणीची पत्रे समितीकडे येऊ लागली. त्यानुसार समितीने तत्काळ टँकर देण्यास सुरुवात केली. हळूहळू दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करत योगदान देण्यास सुरुवात केली. बघता बघता हा आकडा एक हजार टँकर खेपांवर गेल्याचे प्रदीप बागमार यांनी सांगितले.टँकरच्या नियोजनाबाबत दररोज मेहता भवनमध्ये दिवसातून दोन वेळा जन्मकल्याण समितीचे कार्यकर्ते बैठक घेतात. पाऊस पडेपर्यंत टँकर सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून त्यासाठी दानशूर मंडळींनी पुढे यावे, असे आवाहन समितीचे धन्यकुमार शहा यांनी केले आहे.