विरोधकांनी किती आटापिटा केला, सरकार स्थापन झाल्यापासून (महायुती सरकार) सरकार पडेल, सरकार पडेल, मात्र सरकार काही पडले नाही. पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना व अंमलबजावणीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, "आपण परवा ज्या कल्याणकारी योजना जाहीर केल्या. त्या बघून तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते. एकदम पांढरे फटक झाले होते. काय करायचं? काय बोलायचं? काय टीका करायची? हेच त्यांना सुचत नव्हतं. त्यांना हे सर्व अनपेक्षित होतं." एवढेच नाही तर, "आम्ही तिघांनी ठरवलं होतं, एक मोठा बॉम्ब... म्हणजे योजनांचा... योजनांचा निर्णय घ्यायचा," असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
"...आता राज्याचे भविष्यही उज्वल करण्याचा ध्यास" -कायकर्त्यांसोबत संवाद साधताना शिंदे म्हणाले, "राज्याचे वर्तमान सुधारले आहे. आता भविष्यही उज्वल करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. आपण सर्व जण येथे उपस्थित आहात. आपण आपल्या सरकारची ताकद आहात. म्हणून महायुतीची एकजूट मजबुतीने पुढे न्यायला हवी. आता एकजूट महत्वाची आहे. ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. हे सरकार काम करणारे आहे, हे लोकांनीही मान्य केले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. ही आपल्यासाठी मोठी, अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे," असेही शिंदे म्हणाले.