Maharashtra News: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले तरी महायुती सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले नाही. अधिवेशनापूर्वी खात्यांचे वाटप जाहीर केले जाईल, असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात होते. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतली. यावेळी खातेवाटपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती दिली.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी झाला. एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनादरम्यान खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसा निर्णय झाला नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाबद्दलचा मुद्दा निकाली काढला.
फडणवीस म्हणाले, 'लवकरच होणार'
खातेवाटप कधी होणार आहे, खातेवाटपाचा निर्णय इतका का लांबत आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "खातेवाटप लवकरच होणार आहे. लवकरचा अर्थ ते आजही (२१ डिसेंबर) होऊ शकतं किंवा उद्या (२२ डिसेंबर)सकाळी देखील होऊ शकतं", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
काही खात्यांवरून गुंता?
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महायुती सरकारमध्ये काही खात्यावरून गुंता होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खात्यासह इतर काही महत्त्वाची खाती हवी होती, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही काही खात्यांसाठी आग्रही होती.
यासाठी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या मुंबई आणि दिल्लीत बैठका झाल्या. हिवाळी अधिवेशनादरम्यानही हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. अखेर मुख्यमंत्री फडणवीसांकडून यावर उत्तर देण्यात आले.