...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 09:19 PM2024-01-29T21:19:34+5:302024-01-29T21:20:03+5:30

दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही असं अजित पवारांनी सांगितले.

Without a strong leader, the country will not run - Ajit Pawar | ...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

पुणे - Ajit Pawar Interview ( Marathi News ) नीतीश कुमार जेव्हा लालू प्रसाद यादव यांच्यासोबत होते त्यावेळची भाषणे आणि आजची भाषणे ऐकली तर बदल करावा लागतो. आपण का भूमिका घेतो ही लोकांना पटवून द्यावी लागते. सगळ्याच गोष्टी उघड करू शकत नाही. पण काही गोष्टी लोकांच्या मनात त्या नेतृत्वाबद्दल एक गैरविश्वास असतो. विश्वासर्हता कमी होता कामा नये अन्यथा राजकारणात टिकणार नाही. उदा. नाना पाटेकर यांनी अलीकडे सांगितले, त्यांचे वडील काँग्रेस विचारधारेचे होते. कारण तेव्हा काँग्रेस होती. त्यानंतर नाना शिवसेनेकडे झुकले, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नाना पाटेकर असो दादा कोंडके यांना पटले, त्यानंतर आता त्यांना भाजपाचे विचार आवडते. त्यामुळे एक व्यक्ती, तोच कलाकार पण त्या त्या काळात त्यांच्याही मनात मतपरिवर्तन झाले. त्यालाही कारणे असू शकतात असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली. त्यावर अजितदादांनी परखडपणे सर्व विषयांवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरीकडे भाजपा-शिवसेना एकत्रित लढली. पण निकालानंतर कुणाच्या काय मनात आले माहिती नाही. भाजपासोबत आम्ही निवडणूक लढलो असलो तरी आम्ही भाजपासोबत न जाता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी दाखवली. त्यातून सरकार निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका आयुष्यात मांडली. पण उद्धव ठाकरेंकडे सूत्रे आल्यानंतर कशामुळे ते दुखावले गेले, २५ वर्षाची मैत्री तोडून असा निर्णय का घेतला?. निवडणुकीत जनतेने भाजपा-शिवसेनेला कौल दिला होता. स्पष्ट बहुमत आले होते. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे ध्यानीमनी नसताना अचानक सर्व घडलं आणि त्यातून सरकार आले. विचारधारा वेगळी, भूमिका वेगळ्या मग किमान समान कार्यक्रम ठरवून एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. परंतु मधल्या दीड दोन वर्षात कोरोना काळ आला. कोरोनातून बाहेर काढण्यात आमच्या सरकारचा वेळ गेला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत वेगळी भूमिका घेतली. ते राज्याचे प्रमुख झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत नुसते विरोधी पक्षात बसले म्हणजे विकास करता येत नाही. तुम्ही फक्त विरोध करू शकता, सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता. सातत्याने जनतेला जागरुक ठेवण्याचे काम करावे लागले. विरोधी पक्षाला भूमिका मांडावी लागते. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता लोकांना माझी कामे झाली पाहिजे, माझ्या गावचा, वॉर्डाचा विकास झाला पाहिजे असा त्यांचा कल असतो. गेल्या सव्वाचार वर्षाच्या काळात महाराष्ट्राने सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. सोशल मीडियाचा खूप पगडा या गोष्टीवर आहे. २०१४ मध्येही सोशल मीडियाचा वापर करून जनाधार कसा बदलू शकतो हे भारताने पाहिले. आपल्याकडे कधी घडले नव्हते. २०१९ मध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. आता २०२४ मध्येही परिस्थिती आपल्यासमोर आली आहे. राजकारण हा माझा पिंड नव्हता. बारामतीत काम करत करत पुढे आलो. काँग्रेस पक्षाकडून पहिली संधी दिली. दुर्देवाने आमच्या प्रचारावेळी राजीव गांधींसोबत दुर्घटना घडली. दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही. त्यावेळी लोकांचा राजकीय लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी सुसस्कृत राजकारण कसे पाहिजे हे शिकवले. कालांतराने राजकारण बदलले, एका एका राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे पॉवर आली. एनटी रामाराव, चंद्राबाबू नायडू, करुणानिधी, जयललिता, मुलायम सिंग यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हेदेखील पाहिले. आपली लोकशाही एवढी जिवंत आहे, कधी कुणाच्या पाठिशी राहून त्या पदावर बसवेल आणि कधी घरचा रस्ता दाखवेल सांगता येत नाही असंही अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, मी बरीच वर्ष राजकारणात वरिष्ठांसोबत नेतृत्वाखाली काम केले आहे. ज्या ज्या वेळी जे काही निर्णय घेतले ते का घेतली याचा विचार न करता कार्यकर्ता म्हणून त्याचे समर्थन करणे आणि पुढे जाणे हा एकमेव विचार आम्ही केला. १९९१, १९९५ मध्ये आम्ही काँग्रेसकडून उभे राहिलो, १९९९ मध्ये परकीय मुद्दा पुढे आला. देशाचे पंतप्रधानपद एका परदेशी व्यक्तीला का द्यायचे यावरून फूट पडली. वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही मान्य केला. मे महिन्यात हा निर्णय झाला. त्यानंतर ४ महिन्यांनी पुन्हा काँग्रेससोबत सरकार स्थापन करायला सांगितले. त्यावेळी जे वरिष्ठ नेते होते, आज त्यातला एकही नेता सोबत नाही, सगळेच नेते बाजूला गेले आहेत. त्यावेळी आम्ही ज्युनिअर होतो. त्या त्या गोष्टी आम्ही करत गेलो. अनेकदा भाजपासोबत जाण्याचाही विचार सुरू होता. २०१४ ला विधानसभेचा पूर्ण निकाल लागण्यापूर्वी आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा देणार असं विधान केले. वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही गप्प ऐकून घेतला. त्यावेळी बाहेरून पाठिंबा दिला, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, शिवसेना बाहेर राहिली. त्यानंतर पुन्हा सरकारमध्ये आपण जायचे ठरले. मात्र काहीतरी घडले आणि आता जरा अडचणी आहेत सोडून द्या असं आम्हाला सांगितले. १९९१ ते २०२४ आम्हालाही ३२ वर्ष राजकारणात झाली. शेवटी उद्याचा विचार करताना पुढच्या पिढीचे काय, उद्या भवितव्य काय, देशात नेतृत्व कोण करतंय, जागतिक नेता म्हणून कुणाला व्हिजन आहे याचा विचार केला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा सर्वांचा काळ आपण पाहिला. देशात एक मजबूत नेता असल्याशिवाय देशाचा कारभार चालणार नाही हे माझे स्पष्ट मत झालं. हुशार माणसांची डोकी एकत्र आल्यावर सगळा बट्ट्याबोळ होतो हे पाहिले आहे असं मत अजित पवारांनी व्यक्त केला. 

Web Title: Without a strong leader, the country will not run - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.