मुंबई : गिरणी कामगारांच्या समस्या सुटत नसल्याने आता नवनिर्वाचित मोदी सरकारलाच त्यांनी समस्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने घेतला आहे. या निवेदनाबाबतचा ठोस कृती कार्यक्रम आखण्यासाठी गिरणी कामगारांचा मेळावा 29 जून रोजी दुपारी 3 वाजता लोअर परेल, ना. म.जोशी महापालिका शाळेच्या सभागृहात होणार आहे.
गिरणी कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास व्हावा, कामगारांच्या घरांसाठी गिरण्यांची जागा मिळावी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशात बांधलेली भाडेतत्त्वावरील घरे गिरणी कामगारांना मोफत मिळावीत, मुंबईतून गावी स्थलांतरित झालेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यात यावा आणि गिरणी कामगारांचे पुनर्वसन व्हावे; अशा अनेक मागण्या गिरणी कामगारांनी केल्या आहेत.गिरणी कामगार संघटनांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनानंतर त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र ठोस असा कृतीशील कार्यक्रम राबविलेला नाही. परिणामी गिरणी कामगार त्रस्त झाले आहेत. सरकार दरबारी निराशेशिवाय काहीच पडत नाही. म्हणून आता मोदी सरकारकडून गिरणी कामगारांना आशा आहेत. (प्रतिनिधी)
च्मोदी सरकारला द्यावयाचे निवेदन तयार करण्यासह याबाबतचा ठोस कृती कार्यक्रम आखण्यासाठी संघाच्या वतीने गिरणी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
च्29 जून रोजी दुपारी 3 वाजता लोअर परेल येथील ना.म.जोशी महापालिका शाळेच्या सभागृहात हा मेळावा भरेल, अशी माहिती संघाने दिली.