शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट

By admin | Published: August 05, 2016 6:21 PM

समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच मॉडर्न आर्ट किती फालतू आहे, असा मध्यमवर्गीय धटिंगणपणा करण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या त्यामुळेच तयार झाल्या

सचिन कुंडलकर
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
 
नाकासमोर जगणारे आपण घाबरतो कशाला? - अमूर्ततेला.
अमूर्ततेला घाबरणं नाहीतर हसणं हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं.
जे आपल्याला कळत नाही, नवं, अनोळखी आहे त्याची भीती, राग आपणत्या कलेवर, नाहीतर वस्तूवर काढतो. 
समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच मॉडर्न आर्ट किती फालतू आहे, असा मध्यमवर्गीय धटिंगणपणा करण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या त्यामुळेच तयार झाल्या.
 
सध्या सरळ पद्धतीने आपले आयुष्य नाकासमोर जगणारी भारतीय माणसे जर कशाला घाबरत असतील तर ते म्हणजे अमूर्ततेला. ज्याला इंग्रजीमध्ये अ‍ॅब्स्ट्रॅक्ट म्हणतात अशा गोष्टीला. 
आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणापासून अमूर्ततेला घाबरायला आणि हसायला शिकवलेलं असतं. अमूर्तता म्हणजे अशी अवस्था जी संपूर्ण सोपी आणि पटकन पाहता कळणारी नाही. जी समजून घेण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. मनाला संवेदनशील पद्धतीने जागृत ठेवून अनुभव अजमावा लागतो अशी अवस्था. ती आपल्याला नको असते. आपल्याला साधे सोपे आणि चारचौघांसारखे अनुभव हवे असतात. कोणतीही अमूर्तता आली की ती कलेत असो, जेवणात असो किंवा अगदी आपल्या नात्यात असो, आपण त्यापासून घाबरून पळून जातो. आपल्याला ती झेपत नाही. अनोळखी असे काहीही आपल्याला चालत नाही. परदेशातसुद्धा काही हुशार माणसे प्रवासाला जाऊन नायगारा धबधब्यात उभे राहून तिथे उकडीचे मोदक खात बसतात. (मी फेसबुकवर हे फोटो पाहिले आहेत.) 
असे करताना आपण सगळे मर्द मनाचे मिश्या पिरगाळू भारतीय असल्याने आपण स्वत:ला कळत नाही, आपल्याला नवे अनोळखी काही आवडत नाही याची भीती आणि राग त्या कलेवर किंवा त्या अनोळखी वस्तूवर, जेवणावर किंवा अगदी रोजच्या अनुभवावरून सांगायचे तर त्या नात्यावर काढतो. 
लग्न आणि मुले किंवा आईवडील किंवा भाऊ-बहीण यापलीकडची अमूर्त शांत नाती आपल्याला कळत नाहीत. याचे कारण वेगळ्या गोष्टी, वस्तू समजून घ्यायला आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवले नाही. त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवले नाही आणि त्यांच्या आईवडिलांना ब्रिटिशांनी शिकवले नाही. ब्रिटिशांना या भूमीतील मानसिक समृद्धी पुसून टाकून कारकुनांची कार्यशाळा होणारा देश घडवायचा होता. तसा त्यांनी बनवला आणि आपण होऊ दिला. ते निघून गेल्यावर आपले पणजी, पणजोबा हे इतके कारकुनी दुबळे बनले होते की पोट भरणे आणि प्रजोत्पादन यापलीकडे त्यांनी आपल्या आणि आपल्या पुढील पिढीच्या मनाला कोणतीही मानसिक समृद्धी किंवा सौदर्यदृष्टी मिळेल याकडे लक्ष दिले नाही आणि असल्या लोकांनी घडवलेल्या भारताचे हे आजचे उग्र आणि बेसूर स्वरूप आपण अनुभवत आहोत. आपली शहरे, आपली घरे आणि आपली मने ही ब्रिटिश कारकुनी संस्कारांची ठोस बिनडोक आणि सोपी बनली आहेत. त्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आनंदांकडे आणि प्रश्नांकडे आपण एक सुंदर अमूर्तता पाहू शकत नाही, तसे करायला आपल्या लहान मुलांना शिकवू शकत नाही. त्यामुळे आपली मने उदासीनतेला, नैराश्याला आणि भलत्याच स्पर्धेतून तयार झालेल्या ताणाला बळी पडतात. 
आपल्याला आपल्या शिक्षकांनी आईवडिलांनी एम. एफ. हुसेन यांची किलोभर चेष्टा किंवा द्वेष करायला शिकवलेले असते. कुणालाही लहानपणी कलेमधील अमूर्तता समजावून घेण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही. अमूर्त स्वरूपाच्या सुंदर कथा मराठी रंगभूमीवर कायम वावरत आल्या. पण त्या पाहायला न जाता घाणेरडी व्यावसायिक नाटके पाहत बसायची आणि तिथे जाऊन तोंडातून खाताना बाहेर पडणारे बटाटेवड्याचे कच्च्चे पीठ अनुभवायची गोडी आपल्याला लागली. आपण कमल देसाई, विलास सारंग, अरु ण कोलटकर यांना समजावून न घेता अशा लोकांचे साहित्य वाचत बसलो ज्या लेखकांचा परीघ अंबरनाथ, कल्याण स्टेशनांच्या पलीकडे कधीच गेला नाही किंवा शिवाजी पार्कमधून ते मनाने बाहेर पडले नाहीत. आपला आवडता रंग भगवा किंवा लाल. सगळे काही ठोस सोपे आणि मुख्य म्हणजे बटबटीत करून ठेवण्याची आपण सवय लावली आणि त्यापेक्षा कुणी काही वेगळे करायला गेले की हुल्लडबाजी आणि चेष्टा करून ते बंद पाडले. 
प्रायोगिक हा शब्द ज्या राज्यात उगवतो ते राज्य अतिशय दुर्दैवी असावे. वेगळे काही असले की ते प्रायोगिक असते. काही ठरावीक माणसे ते जाऊन पाहतात. आपला सगळ्याशी काय संबंध? आम्हाला वेळ नसतो. मुख्य प्रवाहाचे आणि प्रायोगिक अशी विभागणी आपण सहज करून आपल्या राज्याची बौद्धिक मर्यादा किती मस्तपणे जगासमोर दाखवून देतो. 
आपल्या आईवडिलांनी आपला सगळ्यात मोठा तोटा हा करून ठेवला आहे की त्यांनी आपल्यातला सेन्स आॅफ अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कधी वाढू दिला नाही. अमूर्ततेची सवय लावली नाही. आज एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानामुळे मानवी नातेसंबंधात एक अमूर्तता, एक नकळत अ‍ॅब्स्ट्रॅक्शनयेऊ लागले आहे. घरातल्या रोजच्या जगण्यातील वेगामुळे ते आपल्याला कळत नाहीये. कारण आपली त्या अमूर्ततेशी ओळख करून दिली गेली नाहीये. कुणाचीही त्यातून आता सुटका होणार नाही. मला परवा एक ओळखीच्या आजीबाई म्हणत होत्या की घटस्फोट फार वाढले आहेत बाई हल्ली. आमच्या घरात एवढ्यात तीन झाले, आमच्या कॉलनीत दोन झाले. सोपेच झाले आहे घटस्फोट घेणे तुम्हाला. आपण एकमेकांना सहन करू शकत नाही आहोत. कारण आपल्यात नेहमीपेक्षा वेगळे असे काही पाहण्याची, पचवण्याची आणि शांतपणे स्वीकारण्याची सवय आपल्या शिक्षणाने आणि आईवडिलांच्या मुंजी, सत्यनारायणांच्या संस्कारांनी लावली नाही. ज्याची गरज नाही ते त्यांनी आपल्याला पुष्कळ शिकवले. पण नव्या काळात जगण्यासाठी अनेकविध प्रकारच्या मोकळ्या शिक्षणाची गरज होती, ते शिक्षण ते आपल्याला देऊ शकले नाहीत. 
आपण लहानपणी चांगले गाणे ऐकले नाही. भारतीय शास्त्रीय संगीताइतके अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, अमूर्त सुंदर असे दुसरे काहीही नाही. ज्यांनी ते मनापासून ऐकले त्यांच्या मनात वैचित्र्याला, अमूर्ततेला किंवा कोणत्याही प्रकारच्या वेगळेपणाला सामावून, समजावून घेण्याची प्रवृत्ती तयार होते. महत्त्वाच्या चित्रकारांनी अमूर्त स्वरूपात काम केले त्यामागे त्यांच्या मनातले मोठे अवकाश जगापुढे मांडण्यासाठी रेषेचा आणि त्या रेषेतून निघणाऱ्या अर्थाचा परीघ पुरा पडणार नव्हता. अशा कामाला समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच मॉडर्न आर्ट किती फालतू आहे, आम्हाला नाही बाबा तसले काही समजत अशा पद्धतीचा मध्यमवर्गीय धटिंगणपणा करण्यात पुरु षार्थ मानणारी अख्खी पिढी माझ्या आजूबाजूला होती. मैदानी खेळात, स्वयंपाकात, गाण्यात, अभिनयात, रोजच्या घराच्या साध्या आवराआवरीत एक अमूर्तता आणता येते. ती आणणे कमीपणाचे का? आपल्या इमारती, आपली घरे, आपले रंग, आपले कपडे सगळे एकमेकांसारखे सोपे साधे का असावेत? मला आग्रहाने आजच्या काळातही सुंदर साड्या नेसणाऱ्या माझ्या मैत्रिणी आवडतात. त्या त्यांचा जगण्याचा आग्रह टिकवून ठेवतात. माझी ओळखीची एक मुलगी जवळजवळ जानव्हे घातल्यासारखा दिसणारा अरु ंद पदर घेते. तो पदर लपवत काहीच नाही. तिने साडी नेसायचे तिचे एक वैचित्र्य तयार केले आहे. त्याला लगेच लागतात सगळे हसायला. दुसऱ्याची चेष्टा करणे आणि लगेच नव्या अनुभवाला नाकारणे हे आपल्या मनातील अनोळखी अनुभवाच्या भीतीतून तयार होत असते. नात्यांचे तेच आहे. आपले कुणाशी पटत नसते आणि आपण विचार न करता ते पटकन मोडून टाकायला जातो तेव्हा आपल्याला त्या नात्यातली अमूर्तता, वैचित्र्य कळलेले नसते. काहीतरी वेगळे घडते आहे सध्या कुटुंबांमध्ये, लग्नामध्ये, लहान मुलेसुद्धा हल्ली वेगळ्याच मानसिकतेची जन्मू लागली आहेत. ही नवी रचना आपल्या वैयक्तिक आयुष्याभोवती आकार घेताना ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्यामधील सेन्स आॅफ अ‍ॅब्स्ट्रॅक्शन नीट जोपासायला हवा. 
आपल्या कारकुनी मनाच्या आईवडिलांप्रमाणे आपण आपला संसार करायला गेलो किंवा आपली मुले वाढवायला गेलो तर मोठी पंचाईत होण्याचा काळ येऊ घातला आहे. जगण्याचा वेग, तंत्रज्ञानाची रोजच्या जीवनातील पकड आणि त्यामुळे अस्थिर झालेली मानवी मने पाहिली की कोणत्याही संवेदनशील माणसाला हलून जायला होईल. आपण सगळे एका मोठ्या कालसंक्रमणातून जात आहोत. आणि त्या नव्या काळाला सामोरे जायला आपल्याला स्वत:ला आणि आपल्या पुढच्या पिढीला तयार करायचे असेल तर त्यांच्या मनात तयार होणारा व्हिडीओ गेम्समधून पोचणारा सेन्स आॅफ अ‍ॅब्स्ट्रॅक्ट (अमूर्ततेची जाण) काढून वेगवेगळ्या कलांमधून पाझरणाऱ्या अमूर्ततेला समजावून घेण्याची सवय आपण सगळ्यांनी लावून घ्यायला हवी. 
कळणे आणि न कळणे याच्या मध्येच सगळा सोपा अर्थ उभा असतो. तिथे आपण पोचणार कसे?