नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्ह्यातील एका खून प्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द करून त्याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
विजय गोबरसिंग पवार (५२) असे आरोपीचे नाव असून तो रामगाव हारू, ता. दारव्हा जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे. ९ जानेवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपीलवरील सुनावणीदरम्यान, आरोपीचे वकील ॲड. राजेंद्र डागा यांनी आरोपीचा खून करण्याचा उद्देश नव्हता, त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. उच्च न्यायालयाने यासह विविध कायदेशीर बाबी लक्षात घेत आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ही सुधारित शिक्षा सुनावली. मयताचे नाव विजय चव्हाण होते. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी चव्हाण व आरोपीचे भांडण झाले. ते भांडण सोडविण्यात आल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. दरम्यान, आरोपीने घरून विळा आणून चव्हाणच्या मानेवर वार केला. त्यामुळे चव्हाणचा जागेवरच मृत्यू झाला होता.