पालकमंत्र्यांचे आवाहन : रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटननागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी, अपघात स्थळांचा शोध घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व यांच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी झाले. शहर कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजीव घाटोळे यांच्यासह प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्रामीण शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, रवींद्र भुयार उपस्थित होते.प्रत्येकाने वाहन चालविताना तसेच रस्त्यावरून चालताना स्वत:च्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली पाहिजे. रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृतीसाठी तसेच कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य पुरवठा जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कृष्णा म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान कार्यालयापुरतेच मर्यादित ठेवू नका. शाळा-महाविद्यालयापर्यंत पोहोचवा. या अभियानात सामाजिक संस्था, संघटना यांचाही सहभाग करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शरद जिचकार यांनी केले. त्यांनी या अभियानात राबिवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. आभार सर्जेराव शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन कर वसुली अधिकारी नाना समर्थ यांनी केले. कार्यक्रमाला शहर बस आॅपरेटर्स डीलर्स, वाहन चालक, ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी, राजीव स्पोर्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधे, जीवन सुरक्षाचे राजू वाघ, जनआक्रोश संघटनेचे सचिव रवींद्र कासखेडीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अपघातविरहित शहर व्हावे
By admin | Published: January 13, 2015 1:08 AM