लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढाई आहे. निकालांनंतर भाजपला सत्ता मिळणार नाही हे निश्चित आहे. मात्र राज्यात भाजपचे बळ वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
बंगालमधील सद्यस्थितीत जी राजकीय परिस्थिती आहे ते पाहता ममता बॅनर्जी याच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. मात्र भाजपच्या निकालांचीदेखील दखल घ्यावीच लागेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश झाला असून त्यांचा पराजय झाला तरी ते एक मजबूत पक्ष म्हणून समोर येतील, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तविले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचाराचे नियोजन करत असताना राजकीय व प्रशासकीय मुद्द्यांची सांगड घालण्यात आली आहे. ममता या बंगालमधील सर्वाधिक लोकप्रिय नेत्या आहेत. अनेक मुद्द्यांवर त्यांनी फेरनियोजन केले आहे. काही जागांवर निश्चितच आम्हाला भाजपकडून धोका आहे. मात्र तेथे आम्ही प्रचाराची रणनीती वेगळ्या पद्धतीने आखली आहे, असे किशोर यांनी स्पष्ट केले.
डावे-काँग्रेसचे आव्हानच नाही
एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्यांचा बालेकिल्ला होता. मात्र या निवडणुकीत डावे पक्ष व काँग्रेस यांचे आव्हान फारसे तुल्यबळ नाही. थेट लढत भाजपसोबतच आहे, असे किशोर यांनी प्रतिपादन केले.