लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाज पार्टीने आपल्या रणनीतीमध्ये बदल करीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची उपनिवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीत सर्व जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली.
विशेष म्हणजे ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३२ जागांवर उपनिवडणूक होत आहे. बसपाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची मागील निवडणूक लढली नव्हती. त्याचा थेट लाभ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. भाजपची दहा वर्षांपासूनची सत्ता गेली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने काही जागांवर यश प्राप्त केले. गुरुवारी पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रदेश प्रभारी वीर सिंह, प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने, महासचिव नागोराव जयकर, जिलाध्यक्ष संदीप मेश्राम, उत्तम शेवडे, आदी उपस्थित होते. बसपाने २०१२ नंतर पहिल्यांदा जि.प. निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
.बॉक्स
- दोन दिवसांत उमेदवारांची घोषणा
बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर यांनी सांगितले की, पक्षाच्या उमेदावारांची घोषणा दोन दिवसांत केली जाईल. प्रत्येक जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल.
बॉक्स
- आम आदमी पार्टीही मैदानात
आम आदमी पार्टीनेही जिल्हा परिषद व पंचायत समितीची उपनिवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी प्रताप गोस्वामी, ईश्वर गजबे, मनोहर चौधरी, मनोज वाहाणे, अमन गंथडे, चंद्रशेखर ढोबळे, रजनी दहीकर, आदी उपस्थित होते.