पंचशील चौकात निदर्शने : २४ बाय ७ योजना रद्द करण्याची मागणी नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पाण्याचे खासगीकरण करण्यात आल्याच्या विरोधात नागपूर म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात शनिवारी पंचशील चौक वर्धा रोड येथे नागरिकांनी निदर्शने केली. निदर्शनांचे नेतृत्व करणारे युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी सांगितले की, शहरात पाण्याचे खासगीकरण होऊन सहा वर्षे झाली आहेत. या सहा वर्षात ना नागरिकांना लाभ मिळाला ना महापालिकेला लाभ झाला. उलट महापालिकेवरील संकट वाढत गेले. पाणीपुरवठा व्यवस्था जेव्हा महापालिकेच्या हातात होती, तेव्हा त्याच्या सुधारणेसाठी एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही. परंतु खासगीकरण होताच कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. हे सर्व कुणासाठी होत आहे. खासगीकरणापूर्वी प्रति युनिट ३.२० रुपये पाणी मिळत होते. आता त्याचेच ६.५० रुपये वसूल केले जात आहे. परवानाधारक प्लंबरचा रोजगार हिसकावण्यात आला आहे. पूर्ण काम कंत्राटी तत्त्वावर केले जात आहे. नागरिकांना केवळ दिवसात २ ते ३ तास पूर्ण दाबाने पाणी मिळाले तरी त्यांची गरज पूर्ण होते. परंतु तरीही २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची सक्ती का केली जात आहे. एकूणच हा सर्व प्रकार खासगी कंपनीला लाभ पोहोचवण्यासाठी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नागरिकांनी नारेबाजी करीत पाण्याचे खासगीकरण बंद करा, २४ बाय ७ पाणी करार रद्द करण्यात यावा आणि पाण्याची व्यवस्था महापालिकेने आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी लावून धरली. आंदोलनात शंकर मौर्य, अनिल हजारे, रमेश गवई, खुशाल चवरे, प्रकाश मेश्राम, प्रदीप हजारे, केशव कथले, दीप फुले, देवेंद्र जैन, सुमीत महतो, शुभम कांबळे, किरण ठाकरे, शांता बारसागडे, अनिता मेश्राम, वर्षा गोडघाटे, रुबीना पटेल, शोभा तोडासे, सुषमा वैद्य, उत्तम बाबा सेनापती, मनोज श्रीवास्तव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होते. (प्रतिनिधी)
पाणी खासगीकरणाविरुद्ध नागरिक रस्त्यावर
By admin | Published: January 11, 2015 12:49 AM