नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात मागील काही वर्षांत काँग्रेस माघारली आहे. काँग्रेसला मजबूत करण्यासोबतच राज्य सरकारला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घेरण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विदर्भात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची विदर्भस्तरीय बैठक ६ नोव्हेंबरला नागपुरातील राणीकोठी येथे आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभावामुळे विदर्भात भाजपची स्थिती सुधारली आहे. अशापरिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी विदर्भात काँग्रेसची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. यासाठी विदर्भातील जनतेशी निगडित प्रश्न व शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या तसेच महागाईच्या मुद्यावरून अधिवेशनात सरकारला घेरण्याची व्यूहरचना काँग्रेस आखत आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ६ नोव्हेंबरच्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष व निवडक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला येताना पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रश्न, कापूस संकलन केंद्र सुरू करणे, सोयाबीनला योग्य भाव, सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई अजूनही सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विदर्भातील महापालिका व नगरपालिकांच्या समस्या याबाबतची समरी सोबत आणण्याची सूचना पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. सोमवारी नगरपालिकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. विदर्भात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. वर्ष-दीड वर्षानंतर जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुका आहेत. यानिमित्ताने यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची विदर्भात मोर्चेबांधणी
By admin | Published: November 03, 2015 3:39 AM