सारेगमप संस्थेतर्फे आयोजन : पार्श्वगायक किशोर आणि मुकेश यांना स्वरांजलीनागपूर : रुपेरी पडद्यावरील महान पार्श्वगायक मुकेश आणि किशोरदा यांच्या स्मृतिनिमित्त सारेगम संस्थेतर्फे उभय कलावंतांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. मुकेश यांच्या मुलायम स्वरातील तर किशोरदांच्या हरहुन्नरी स्वरातील सिनेगीत म्हणजे श्रोत्यांसाठी आनंदाचाच विषय असतो. अशाच गीतांची मैफिल डॉ. देशपांडे सभागृहात आज सादर करण्यात आली. या कार्यक्रमात राजू व्यास, अजय मलिक, वि. के. सहारे, मुमताज खान, नितीन झाडे, सागर मधुमटके, राजा दुरणे, रवींद्रसिंग जानेवार, चांदूरकर, आकांक्षा नगरकर व निशिगंधा शर्मा या नव्या-जुन्या गायकांचा सहभाग असलेल्या यावेळी एकूण २७ गीते सादर करण्यात आली. मुकेश आणि किशोरदा यांच्या प्रवासात ते गायक आणि नायक म्हणून त्यांची ख्याती होती.या गायकांच्या स्वरातील एकल व युगलगीते स्वरानंदांचा ठेवा होत्या. दिग्गज शायर व संगीतकारांच्या शब्दस्वरांना अधिक श्रीमंत करणाऱ्या या गायकांची नितांत श्रवणीय गीते यावेळी सहभागी गायकांनी तयारीने सादर केली. राजू व्यास यांच्या स्वरातील ‘चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वरसजनी...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर ‘तेरा साथ है तो मुझे क्या कमी है..., ऐसे मुझे ना देखो.., मेरे दिल मे आज क्या है.., मै ना भुलूंगा..., चेहरा है या चाँद खिला है..., जाने कहां गये वो दिन..., छु कर मेरे मन को...’ आदी गीतांनी यावेळी कार्यक्रमाची रंगत वाढविली. सागर आणि आकांक्षा यांनी काही युगलगीते सादर करून रसिकांना आनंद दिला. याप्रसंगी अतिथी गायक एम. ए. कादर यांच्या ‘बहोत याद आए...’ या गीताने कार्यक्रमाची उंची वाढली. निवेदन श्वेता शेलगावकर आणि अजीज खान यांचे होते. स्थानिक कलावंतांनी गायकांना वाद्यांवर सुयोग्य साथ केली. जीवनाश्रय संस्थेच्या सहाय्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)
जुन्या लोकप्रिय गीतांनी सजलेली मैफिल
By admin | Published: August 27, 2014 12:59 AM