लाचखोरांचा मोह सुटेना : कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात एसीबीच्या ९९ कारवाया
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीने सार्यांची दाणादाण उडवली आहे. कोरोनाने सर्वांच्या तोंडावर केवळ मास्कच आणला नाही, तर अनेकांचे हातही बांधले आहेत. बहुतांश रोजगार, उद्योग-धंदे ठप्प पडले आहेत. प्रत्येक जण हवालदिल आहे. मात्र अशातही भ्रष्टाचाराने बरबटलेले लाचखोर मोह सोडायला तयार नाहीत. पैशासाठी हपापलेली ही मंडळी प्रसंगी आपली नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठाही डावावर लावत आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने केलेल्या कारवायांतून हे उघड होत आहे. कोरोनाच्या महामारीतही भ्रष्टाचाराची गाडी सुसाट वेगाने धावत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
---
कोणत्या वर्षात किती कारवाया
गेल्या तीन वर्षांत एसीबीने २१० कारवाया केल्या. त्याचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.
२०१९ : १११
२०२० : ०७२
२०२१ : ०२७
----
कोरोनाकाळातही वरकमाई सुरूच
कोरोनाळात ग्राम विकास कृषी विभाग, महसूल आणि पोलिसांची वरकमाई जोरात सुरू असल्याचे झालेल्या कारवाईतून स्पष्ट होते.
---
विभागवार कारवाया (२०२०)
ग्राम विकास कृषी विभाग : १५
पोलीस : १४
महसूल : १०
वनविभाग : ०९
नगरविकास : ०६
आरोग्य विभाग : ३
उद्योग : २
महावितरण : २
परिवहन : १
बांधकाम विभाग : ०१
इतर : ९
------------------------------
एकूण : ७२
-----------------
विभागवार कारवाया (२०२१)
ग्राम विकास कृषी विभाग : ०७
पोलीस : ०५
महसूल : ०३
शालेय शिक्षण व क्रीडा : ०२
वनविभाग : ०२
नगरविकास : ०३
सहकार १
महावितरण : ०१
इतर : ०३
------------------------------
एकूण : २७
-----------------
भ्रष्टाचार संपविण्यासाठी एसीबी कटिबद्ध
भ्रष्टाचार संपविण्यासाठी एसीबी कटिबद्ध आहे. कोणत्याही लोकसेवकाकडून लाचेसाठी कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात.
- रश्मी नांदेडकर
एसपी, एसीबी, नागपूर.
---