नागपूर : तांबेखणी (उमरेड) येथील एका खुनाच्या प्रकरणावर १४ वर्षांनंतर निर्णय आला आहे. नागपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांनी गेल्या शनिवारी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली आहे. हे आरोपी एकाच कुटुंबातील आहेत.सुधाकर, मधुकर, बबन, गोविंदा, वेणूबाई व कचराबाई चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. पुरुषोत्तम नागोसे असे मृताचे नाव असून ते जाटतरोडी, नागपूर येथील रहिवासी होते. सरकारी पक्षानुसार, लोणबैले व चौधरी परिवारामध्ये शेतीवरून वाद होता. २० जून २००१ रोजी लोणबैले परिवारातील सदस्यांनी पुरुषोत्तम (लोणबैले परिवाराचे जावई) यांना सोबत घेऊन शेतात वखरणी सुरू केली होती. चौधरी परिवाराने त्यावर आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, कुऱ्हाडीने मारण्यात आल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुरुषोत्तम यांचा मृत्यू झाला. शेषराव व मोहन लोणबैलेही गंभीर जखमी झाले तसेच चौधरी परिवारातील सुधाकरला भाल्याने भोसकण्यात आले होते. यानंतर दोन्ही परिवारांनी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौधरी परिवारातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३२४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नोंदविला होता. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रशीदा बेगम व जखमी साक्षीदार मोहन यांच्यासह एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. बचाव पक्षातर्फे अॅड. आर. बी. गायकवाड व अॅड. चंद्रशेखर जलतारे तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
खुनाच्या प्रकरणावर १४ वर्षांनंतर निर्णय
By admin | Published: November 03, 2015 3:36 AM