- घरोघरी होतेय महिलांची तुफान गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जानेवारी हा महिना खऱ्या अर्थाने महिलांचा महिना म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या पर्वापासून महिलांच्या हळदी-कुंकवाला प्रारंभ होतो आणि महिला घरोघरी जाऊन आदरातिथ्याचा मान स्वीकारत असतात. मात्र, या सहृदय कार्यक्रमांतून कोरोना नियमांची पार धूळदाण उडविली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. महिलांचा वावर असा आहे, जणू कोरोना समूळ नष्ट झाला की काय, असे त्यांच्या एकूणच वहिवाटीवरून दिसायला लागले आहे. सणोत्सव साजरा करताना कोरोनाचा संक्रमण पसरणार नाही, याची काळजी महिलांनी घेतली, तरच त्यांचे कुटुंब आणि त्यावाटे समाज संक्रमणमुक्त होणार आहे, हे समजणे गरजेचे आहे.
१४ जानेवारीपासून हळदी-कुंकू आणि वाण वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्याअनुषंगाने महिला नटून-थटून घोळक्याने एकमेकींच्या घरी जात आहेत. तथापि, हा सर्व आनंदाचा उत्सव साजरा करताना कुठलीच काळजी घेतली जात नाही, असेच दिसते आहे. कुणीच मुखाच्छादन (मास्क), निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) आणि व्यक्तिश: अंतर (फिजिकल डिस्टेन्सिंग) पाळत नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. मास्क, सॅनिटायझरबाबत विचारणा केली असता, महिला हसून मोकळ्या होतात आणि तुमच्याकडे अजूनही कोरोना आहे का, असे विडंबन करताना दिसतात. मात्र, ज्या घरी कोरोना रुग्ण आढळला किंवा आढळतो, त्यांच्या घरी कशी स्थिती असते, याकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे, स्पर्श हा सगळ्यात मोठा धोका कोरोना संक्रमणाबाबत आहे. हळदी-कुंकू स्पर्शाशिवाय होत नाही. अशा स्थितीत परंपरेचा मान ठेवत काळजी घेणे, हे महिला भगिनींनी समजून घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला एकाच वेळ ५०-५० महिला एकत्र येत असल्याने कोरोना नियमाबाबत धूळदाण उडविली जात आहे, हे विशेष.
कोरोना संसर्गाचा दररोजचा आकडा
१३ जानेवारी : पाॅझिटिव्ह - ४६२, मृत्यू - ३
१४ जानेवारी : पाॅझिटिव्ह - ३२०, मृत्यू - ५
१५ जानेवारी : पाॅझिटिव्ह - ३१५, मृत्यू - ५
१६ जानेवारी : पाॅझिटिव्ह - २७१, मृत्यू - ३
आता धोका महिलांना
संसर्गाच्या प्रारंभिक अवस्थेत कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचा मोठा समावेश होता. त्या काळात महिला घरीच राहत असल्याने बाधितांमध्ये त्यांची संख्या फार कमी होती. आता पुरुष आपल्या कार्यालयात जाताना किंवा कामासाठी बाहेर पडत असताना विशेष काळजी घेताना दिसतात. मात्र, हळदी-कुंकवासाठी बाहेर पडणाऱ्या महिला कुठलीही काळजी घेत नाहीत, ही स्थिती आहे. त्यामुळे येत्या काळात संक्रमितांमध्ये महिलांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लस आली म्हणून धोका टळला नाही
काळजी हाच सर्वांत मोठा उपचार असतो. कोरोनावरची लस आल्यावरही नागरिक काळजी घेत नसतील, तर लसीकरणाचा काहीएक लाभ होणार नाही. लसीकरणास प्रारंभ झाला असला तरी धोका सध्या तरी अटळ आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:ची काळजी घेण्यासोबतच कुटुंबाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
मुखाच्छादन, निर्जंतुकीकरणाचा वापर करा
मुखाच्छादन (मास्क) व निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) चा वापर अनिवार्य आहे. कुणाच्याही घरात प्रवेश करताना या दोन्ही गोष्टी महिलांनी पाळाव्या. ज्या घरी एकत्रीकरणाचा कार्यक्रम आहे, त्यांनीही दारावर हात-पाय धुण्यासाठी पाण्याने भरलेली बादली ठेवणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे गरजेचे आहे, तरच आलेली आपत्ती दूर करता येणार आहे.
मास्क, सॅनिटायझर वाण म्हणून द्या
चमचे, फणी, कुंकवाच्या डब्या आणि इतर वस्तू वाणात देणे या जुन्या गोष्टी झाल्या. संसर्गाच्या या काळात जनजागृती म्हणून महिलांनी मास्क, सॅनिटायझरच्या बॉटल वाणात देण्याचे प्रचलन सुरू केले, तर त्याचा लाभच होणार आहे.
पुरुषांनीही जनजागृती करावी
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पुरुषांना कोणतेही स्थान नसते. बहुदा अशावेळी पुरुष मंडळी बाहेरच असतात. याच वेळी पुरुषांनी घरातील महिला मंडळाला संसर्गाचा धाक दाखविण्यासोबतच घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. महिलांनीही याबाबत सजग असले महत्त्वाचे ठरणार आहे.
...........