संजय देशमुख : ‘इन्स्पायर’ विज्ञान शिबिराचे थाटात उद्घाटननागपूर : नागरिकीकरण, प्रदूषण यासारख्या समस्यांमुळे भविष्यात मोठा धोका संभवतो. या समस्यांवर संशोधनाच्या माध्यमातूनच नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे. यात संशोधकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सक्षम भारताच्या उभारणीचा मार्ग विज्ञानातूनच मिळणार असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे जैविक विज्ञानाचे अभ्यासक व शास्त्रज्ञ डॉ.संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ‘इन्स्पायर’(इनोव्हेशन इन सायन्स परसुईट फॉर इन्स्पायर रिसर्च) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित विज्ञान मार्गदर्शन शिबिराचे शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘इन्स्पायर’च्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके, डॉ. रमेश ठाकरे, प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला नागपूर तसेच अमरावती विभागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे.नैसर्गिक विज्ञान हा उच्च शिक्षणाचा मूळ गाभा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विज्ञानातूनच आयुष्यात चांगल्या संधी निर्माण होतात. विज्ञान प्रगती आव्हानात्मक होण्यासाठी ‘इन्स्पायर’सारखे प्रकल्प मार्गदर्शक ठरतील असे देशमुख म्हणाले. ‘इन्स्पायर’मधून विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडच्या विज्ञानाच्या जवळ जाण्याची संधी मिळेल. यातून त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल असे प्रतिपादन अॅड.शेळके यांनी केले. प्राचार्य डॉ. बुरघाटे यांनी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पहिल्या दिवशी रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ डॉ.सी.पी.राव यांनी विज्ञानाची व्यवसाय म्हणून का निवड करावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर जैविक विज्ञानतज्ज्ञ डॉ.शर्मिला मांडे यांनी ‘हाऊ मायक्रोब्ज रुल द वर्ल्ड’ या विषयावर व्याख्यान दिले. समन्वयक डॉ. वझलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन कांचन दाते यांनी केले तर उपसमन्वयक दीपक कडू यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दर्शना कोकाटे यांनी आभार मानले. यावेळी ‘इन्स्पायर’शिबिराच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.(प्रतिनिधी)
विज्ञानातूनच घडेल सक्षम भारत
By admin | Published: January 13, 2015 1:06 AM