- कोरोनात परवानगी पन्नासची : अग्निदिव्य नेमके कुणाचे, आयोजकांचे की प्रशासनाचे?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या लाटेतील कोरोना संक्रमण कमी झाल्याने रखडलेले विवाह सोहळे पार पाडण्याची लगबग कुटुंबीयांची सुरू झाली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल केलेले नाहीत. विवाह सोहळ्यांना केवळ ५० आमंत्रितांसोबतच परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक जण मंगल कार्यालये सोडून हॉटेल, रेस्टॉरंटचा मार्ग पकडत आहेत. शिवाय, कुणाला आमंत्रण द्यावे आणि कुणाला देऊ नये, अशी पंचाईत कुटुंबीयांची झाली आहे. नागपुरात असे अनेक दुखणे गाताना कुटुंबीय दिसतात. शिवाय, परवानगी कशी मिळवायची, हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे.
------------
विवाह सोहळ्याची परवानगी
नागपुरात महानगरपालिकेचे दहा झोन आहेत. त्या त्या झोनमधील विवाह सोहळ्याची परवानगी त्या त्या झोनमधून सहज उपलब्ध होते. यासाठी आयोजकांनी पत्रिका जोडून किंवा साध्या कागदावर अर्ज लिहून वर-वधूची संपूर्ण माहिती, विवाहाची तारीख, स्थळ व आमंत्रितांची संख्या सादर करायची आहे. या अर्जानंतर कुठलीही अट नाही किंवा परवानगीसाठी कुठलेही पत्र दिले जात नाही. बरेच कुटुंबीय परवानगी न घेताही हे सोहळे पार पाडत असल्याचे दिसून येते. अशा सोहळ्यांवरही कुठलीही कारवाई केली जात नाही; मात्र नियमाबाहेर गर्दी आढळून आली किंवा तशा तक्रारी आल्या तर झोनच्या संबंधित पथकाकडून ५ ते २५ हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो.
--------------
प्रशासकीय अटी
- ५० पेक्षा जास्त आमंत्रित नकोत.
- सोहळ्यात व्यक्तीश: अंतर पाळावेत.
- प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुखपट्टी (मास्क) अनिवार्य आहे.
- सॅनिटायझर, निर्जंतुकीकरणाची खात्री आयोजकांनी, मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी, हॉटेल संचालकांनी करावी.
-------------
विवाहासाठीचे मुहूर्त
भारतीय पंचांगानुसार जुलै महिन्यात विवाहयोग्य पाच असे सर्वोत्तम मुहूर्त आहेत. १, २, ३, १३, १५ जुलै रोजी हे सर्वोत्तम मुहूर्त येत आहेत. शिवाय, आपत्कालीन स्थितीत वेळ-काळ-ग्रह-नक्षत्र-राशी या नुसारही काही मुहूर्त काढले जात आहेत. निर्बंधाची ही स्थिती आणखी किती काळ राहणार हे माहीत नसल्याने चातुर्मासात ऑगस्टमध्ये १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७ (८ मुहूर्त), सप्टेंबरमध्र्ये १६ (१ मुहूर्त) आणि ऑक्टोबरमध्ये ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४ (९ मुहूर्त) या तारखांना आपत्कालीन मुहूर्त ज्योतिषांनी काढलेले आहेत.
---------
पत्रिकाच छापल्या नाहीत
कोरोना संक्रमण अजूनही सुरूच आहे. २९ जुलै रोजी माझा शुभविवाह आहे. कौटुंबिक मंडळी अनेकांना बोलाविण्यास आसुसले आहेत. मात्र, स्थितीचे गांभीर्य बघून मी कुणालाच बोलवायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. पत्रिकाच छापत नसून केवळ देवकार्यासाठी व विवाह नोंदणीसाठी म्हणून दोन पत्रिका बनवून घेतल्या आहेत.
- सचिन चिरवटकर, इतवारी
--------
परवानगीला कसलाच त्रास नाही
माझ्या सालीचे २५ जुलै रोजी लग्न आहे. कुटुंबाचा आवाका खूप मोठा आहे. मात्र, कोरोनाने अनेक निर्बंध आणले. परवानगी मिळेल की नाही, असे वाटत होते. मात्र, अगदी सहज सोप्या मार्गाने परवानगी प्राप्त झाली. केवळ शपथपत्र द्यावे लागले.
- आलोक हरडे, महाल
.................