नागपूर : केंद्र सरकारने डाळींवर पुन्हा स्टॉक मर्यादा लावल्याने आणि आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने धान्य व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही अडचणी येणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या निर्णयामुळे धान्य बाजार बंद होण्याची शक्यता असून, त्याची सुरुवात अमरावती धान्य बाजारापासून झाली आहे.
या संदर्भात होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर सरकारने सर्व व्यापाऱ्यांसाठी डाळींची आयात सुरू केली, तर २ जुलैला परिपत्रक काढून डाळींच्या साठवणुकीवर तत्काळ स्टॉक मर्यादा लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार होलसेल व्यापारी २०० टन अर्थात दोन हजार क्विंटल डाळींचा स्टॉक ठेवू शकेल. त्यात केवळ एक हजार क्विंटल डाळींचे प्रकार ठेवता येईल. चिल्लर परवान्यासाठी पाच टन अर्थात ५० क्विंटल डाळींची मर्यादा निर्धारित केली आहे. दाल मिलर्सला ही मर्यादा तीन महिन्यांचे उत्पादन वा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के, यापैकी जी जास्त राहील ती असणार आहे. धान्यासाठी कोणतीही मर्यादा राहणार नाही.
शेतकरी अडचणीत येणार
मोटवानी म्हणाले, या निर्णयामुळे व्यापारी मर्यादित स्टॉक ठेवतील. पण, शेतकऱ्यांच्या उत्पादनाची विक्री न झाल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ते अडचणीत येतील. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला भिडले असून, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. दुसरीकडे साठेबाजी थांबविण्यासाठी स्टॉक मर्यादा लागू केली आहे. आयात खुला केल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येणार आहे. याच कारणांनी अमरावती धान्य बाजारात काम बंद आहे. लवकरच नागपूरसह राज्यातील अन्य बाजारपेठाही बंद होण्याची शक्यता आहे.