लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने नागपूरसह चंद्रपूर, भंडारा, गडचिराेली, गाेंदिया जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, रखडलेल्या पेरणीला आता वेग येणार आहे. दरम्यान, वीज काेसळल्याने दाेन जणांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात घडली.
नागपुरात गुरुवारी दुपारी चांगला पाऊस झाला. यासोबतच उमरेड, कुही, भिवापूर या तालुक्यांमधील ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने बळीराजाचे टेन्शन थोडेफार दूर केले आहे. खरीप हंगामाअंतर्गत चिखलणी व रोवणीचे कामेही जोमात सुरू होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही गुरुवारी दमदार पाऊस बरसला. चंद्रपुरात सकाळी १० वाजेपासूनच दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पर्जन्यमान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक ३६२ मि.मी. सावली तालुक्यात १८३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
वीज पडून दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
मूल (चंद्रपूर) : वीज पडून दाेन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बाेंडाळा (ता. मूल) येथे गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली, तर दाेन जण जखमी झाले. विलास केशव नागापुरे (५०) व गयाबाई पोरटे (६०) अशी मृतांची, तर नामदेव पोरटे आणि ताराबाई नागापुरे अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात हाेताच ते सर्व शेतातून घरी येण्यास निघाले. दरम्यान, पाऊस वाढताच त्यांनी नांदगाव-देवाळा मार्गावरील नागमंदिरच्या जवळील निंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. याचवेळी निंबाच्या झाडावर वीज पडल्याने दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दाेघे जखमी झाले. जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.