लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना धक्का देण्याची युवासेनेची तयारी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील वादग्रस्त पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सक्रिय कार्यकर्त्यांना बढती देऊन निष्क्रिय लोकांना हटविण्यात येईल, असे खडे बोल युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी सुनावले. युवासेनेच्या संवाद दौऱ्यासाठी नागपुरात आलेल्या सरदेसाई यांनी पदाधिकारी मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांसमोरच पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
मुंबई व मराठवाड्यानंतर विदर्भात युवा सेनेचा संवाद कार्यक्रम सुरू झाला आहे. याअंतर्गत त्यांनी पदाधिकारी व कार्ककर्त्यांशी संवाद साधला. लवकरच बूथ व प्रभाग पातळीवर समिती गठित होईल. महाराष्ट्रात शिवसेनेचा जनाधार वेगाने वाढत असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे. भविष्यात शिवसेनेला याचा निश्चितच लाभ पोहोचेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनाची एकूण स्थिती पाहता युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या सेवेच्या कार्याला वेग द्यायला हवा, असे आवाहन सरदेसाई यांनी केले. यावेळी खा.कृपाल तुमाने, आ.दुष्यंत चतुर्वेदी, आ.आशीष जयस्वाल, शहरप्रमुख प्रमोद मानमोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, महाविकास आघाडीत सहभागी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता कमी होत आहे. जर वेळ आली तर शिवसेना महानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे, असा दावा वरुण सरदेसाई यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला. नागपूरसह विदर्भात संघटनेतकडे पक्षाचे दुर्लक्ष झाल्याच्या आरोपांवरदेखील त्यांनी भाष्य केले. कोरोनामुळे काही जागांवर असे झाले आहे. परंतु भविष्यात असे होणार नाही. मुंबईतील एका नेत्याला संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात येईल व तो महिन्यातील एक आठवडा जिल्ह्यात राहील, असे त्यांनी सांगितले