नागपूर : देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असता तर आम्हाला शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची गरज पडली नसती. हे आंदोलन कमकुवत असलेल्या विरोधी पक्षामुळेच उभे राहिले. आम्ही बाहेर लढत आहोतच. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सभागृहात आमची बाजू मांडावी. तरच ते शेतकऱ्यांसोबत आहेत असे समजावे लागेल, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर कमिटीचे सदस्य राकेश टिकैत यांनी केले.
संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राकेश टिकैत नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ते म्हणाले, आमचे आंदोलन कुण्याही पक्षाविरोधात नाही तर केंद्र सरकारने केलेले तीन बिल परत द्यावे, या एकमेव मागणीसाठी आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो. मात्र न्यायालयाने नेमलेल्या समितीतील सर्व सदस्य कायदे समर्थक आहेत. त्यामुळे आम्ही या समितीशी चर्चा वा वाटाघाटी करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पत्रकार परिषदेला संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे, राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, शेतकरी नेते अरुण वनकर, जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
...
राजभवनाला ट्रॅक्टरचा घेराव घालणार
१८ जानेवारीला महिला किसान सन्मान दिवस आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, २३ जानेवारीला एक हजार ट्रॅक्टरसह राजभवनला घेराव घालण्याचे नियोजन आहे. गनिमी कावा पद्धतीने होणारे हे आंदोलन कुठल्या राजभवनावर होईल, हे वेळेवर ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले. २६ जानेवारीला सुद्धा देशव्यापी आंदोलन उभारले जाईल. मात्र ते कशा स्वरूपाचे असेल, हे त्यांनी जाहीर केले नाही.
...
तर त्यांनी बाहेर पडावे
‘किसान बिल वापसी नाही, तोपर्यंत किसान वापसी नाही’, अशी भूमिका स्पष्ट करून टिकैत म्हणाले, आमच्या आंदोलनात सुमारे ५५० संघटना आहेत. यापैकी एकही संघटना माघार घेणार नाही. मे २०२४ पर्यत आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे. इतका दीर्घकाळ धीर धरण्याची तयारी नसणाऱ्यांनी आंदोलनातून बाहेर पडले तरी चालेल. आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही तर सरकार विरोधात आहे.
...
संयुक्त किसान माेर्चाचे समन्वयक चौधरी राकेश टिकैत यांची टीका
लुटारूंचे शेवटचे बादशहा कोण आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. हे बादशहा शेतकऱ्यांना लुटण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहेत. पण, आम्ही या बादशहाचे प्रयत्न हाणून पाडू, अशी टिका टिकैत यांनी मोदींचे नाव न घेता केली.
कृषी कायदे रद्द होईपर्यत घरी परतायचे नाही हा आंदोलकांचा वज्रनिर्धार आहे. किमान हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यत आम्ही तसूभरही हलणार नाही, असे टिकैत यांनी स्पष्ट केले.