श्रेयस व मानसी बडवे यांनी गुंफले दुसरे पुष्प नागपूर : देशाच्या रक्षणासाठी मन घडले तरच मनगट घडतील. मनाला घडविण्याचे अलौकिक कार्य नामदेवांनी केले. तर पावनखिंडीत अडकलेल्या छत्रपती शिवरायांना मनगटाच्या बळावर बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणाची बाजी लावत आपल्या शूर राजाला वाचविले, असे विचार कीर्तन महोत्सवातील दुसरे पुष्प गुंफतांना श्रेयस व मानसी बडवे यांनी कीर्तन जुगलबंदीत सादर केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती, राधा गोविंद ट्रस्ट यांच्यावतीने चिटणीस पार्क मैदानावर आयोजित कीर्तन महोत्सवातील कीर्तनाचे दुसरे पुष्प अर्पण करताना पुणे येथील युवापिढीतील नामवंत कीर्तनकार श्रेयस व मानसी बडवे यांनी गुंफले. शनिवारी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी ब्रह्मस्थानंद, दत्ता महाराज, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे व आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. आजची आरती शैलेष व आरती कुलकर्णी आणि अनिल व शालिनी मानापुरे यांच्या हस्ते पार पडली. कीर्तन परंपरेतील अत्यंत रंजक असा प्रकार म्हणजे कीर्तन जुगलबंदी. नागपूरकर रसिकांना कीर्तन जुगलबंदीचा प्रकार बडवे दाम्पत्यांनी अत्यंत खुबीने सादर करीत बाजीप्रभू देशपांडे व संत नामदेव यांचे चरित्र सादर केले. कीर्तन जुगलबंदी सादर करतांना सवालजवाब करतानाच पुढच्या व्यक्तीच्या विचारांचे खंडन-मंडन करण्याची प्रथा आहे. यावेळी पूर्वरंग सादर करताना संत तुकारामांच्या दास सहाय्य नारायण अभंगातील पदाचे निरुपण केले. देव हा भक्तांचा पाठीराखा असून त्याच्या मदतीला धाव घेणारा आहे, अशी भूमिका श्रेयस बडवे यांनी मांडली. त्यावर उत्तर देतांना देव भक्तांना मदत करण्यापेक्षा भक्तच देवाच्या मदतीला येतो, असे सांगत हनुमंताचे उदाहरण दिले. हनुमंताने सीतेचा शोध लावला. सेतू बांधला, लक्ष्मणास संजीवन बुटी आणून देत त्याचे प्राण वाचविले. तसेच जनाबाईचा अभंग ज्याने वदिला ‘हो आपला मामा, तो येईल का आपल्या कामा’ हा अभंग सादर करीत ज्याने आपल्या मामाचा वध केला. तो कृष्ण आपल्या कामी येणार का, असा सवाल केला. भक्तच देवाला मोठे करीत असतो हे पटवून देत असतानाच बाजीप्रभू होते म्हणून शिवाजी वाचले. भक्त होता म्हणून देव वाचला. यावर भक्तांसाठी देव कुठल्याही रूपात अवतरतो. भक्ताच्या हातून जे ही कार्य घडतं त्याची बुद्धी भगवंतच भक्ताला देत असतो. असे सांगत भगवंताचा भक्ताशी असलेला संबंध अधोरेखित केला. यावेळी यमन रागातील राम कृष्ण हरीने सुरुवात करतांना अनेक भक्तिगीते व भावगीते ही त्यांनी सादर केली. आज देशासाठी मरण्याची नाही तर जगण्याची गरज आहे. साध्या-साध्या गोष्टी व प्रवृत्तींशी लढण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांतून प्रेरणा घेत आपले कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय विषयावर चिमटे काढत कीर्तन रंगविले. (प्रतिनिधी)
मन व मनगट घडली पाहिजेत
By admin | Published: January 11, 2015 12:47 AM