लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : नैसर्गिक आपत्ती, पावसाची उघडीप यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. मांढळनजीकच्या तारणा, चिकना, वीरखंडी शिवारात माकडांचे कळप साेयाबीन पिकांमध्ये धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान हाेत आहे.
यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशीची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने माेठी उघडीप दिली. यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच आता साेयाबीन व इतर पिकांमध्ये रानडुकर, हरिण, नीलगाय व माकडांचे कळप हैदाेस घालत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. मांढळ परिसरातील तारणा, चिकना, डोंगरमौदा, वीरखंडी, ठाणा, हरदोली, कऱ्हांडला, गाेठणगाव व इतर गावे जंगलालगत आहेत. सध्या बहुतांश शिवारात साेयाबीन, मिरची, कपाशी, तूर, धान पिके डाेलत आहेत. या शिवारात ३० ते ४० च्या संख्येत माकडांचे कळप साेयाबीन व इतर पिकांमध्ये उपद्व्याप घालत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन तात्काळ माकडांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.