लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पार्टी करून घराकडे निघाल्यानंतर दुचाकी चालविताना केलेला हलगर्जीपणा एका तरुणाच्या जीवावर बेतला. धर्मपाल देविदास बारसागडे (वय ३५) नामक तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
बीडगावमध्ये राहणारा धर्मपाल बारसागडे, निखिल रवींद्र भांगे (वय ३०) हे एका दुचाकीवर तसेच दुसऱ्या दुचाकीवर भूषण वाघमारे आणि संदीप दुपारे त्यांच्या मित्रांसह २४ जूनला रात्री जेवण करण्यासाठी पारडीला गेले होते. जेवण केल्यानंतर परत येताना बारसागडेने वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने अपघात घडला. त्यामुळे बारसागडे तसेच भांगे दोघेही जबर जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शनिवारी सकाळी ६.४५ ला बारसागडेला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----