मंगेश व्यवहारे नागपूर : ‘मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी रेकी करायची गरज नाही,’ असा टोला मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार संजय राऊत यांना लगावला.
संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणे म्हणाले,‘खिचडीचोर नेमका कुठे राहतो, खिचडी कुठे डिलीव्हर करायची आहे हे पाहण्यासाठी ते लोक आले असावेत.
संजय राजाराम राऊत यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे महत्त्व नाही. त्यांचे राजकीय महत्त्व जनतेने संपविले आहे. अशा मच्छरांना मारण्यासाठी आम्ही गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विन आला आहे. याला फार गांभीर्याने घेऊ नये.