हायकोर्ट : मेहंदीबाग रेल्वेगेट वाहतूक कोंडीचे प्रकरणनागपूर : मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना सुचविणाऱ्या व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) समितीच्या अहवालावर आक्षेप घेण्यात आला आहे. खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीचे अध्यक्ष सचिन बिसेन यांची यासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. शासनाने मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी व्हीएनआयटी अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने अहवाल देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी मेहंदीबाग येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला समांतर दुसरा रेल्वे अंडरब्रिज बांधण्याची सूचना केली आहे. याचिकाकर्त्यांनी याचा विरोध केला आहे. सध्याच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाऊस आल्यानंतर पाणी साचते. यानंतर येथून तासंतास अवागमन करता येत नाही. अशा परिस्थितीत दुसरा रेल्वे अंडरब्रिज किती उपयोगी ठरेल, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला. तसेच, समितीने समस्येचा अभ्यास करताना इंडियन रोड काँग्रेस व इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हिल इंजिनिअरिंग यांच्या मार्गदर्शकतत्वांचा विचार केला नसल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड़ अनिल किलोर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)अहवालाचा पुनर्विचार कराइंडियन रोड काँग्रेस व इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हिल इंजिनिअरिंग यांची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन अहवालाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेतल्यानंतर अहवालात बदल करायचा की, जुनाच अहवाल कायम ठेवायचा याचा निर्णय घेऊन तीन आठवड्यांत माहिती सादर करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
व्हीएनआयटी समितीच्या अहवालावर आक्षेप
By admin | Published: January 08, 2015 1:20 AM