राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : एकीकडे पावसाने पाठ फिरविली असून, दुसरीकडे पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पिके वाचविण्यासाठी ओलित करायचे झाल्यास महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बिघडलेले ट्रान्सफार्मर वारंवार मागणी करूनही दुरुस्त केले नाही. त्यातच दुरुस्तीचा रेटा वाढत गेल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना ‘आधी बिले भरा, नंतर ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करू’ असे सुनावत त्यांची अडवणूक करायला सुरुवात केली. आधीच आर्थिक अडचणी, त्यात ही बिले भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न देवरी-बाेर्डा (ता. रामटेक) शिवारातील शेतकऱ्यांनी केला आहे.
देवरी-बाेर्डा शिवारातील ट्रान्सफार्मरवर ५१ शेतकऱ्यांना कृषिपंपाचा वीजपुरवठा देण्यात आला आहे. हे ट्रान्सफार्मर पाच महिन्यापासून बिघडलेले असून, ते दुरुस्त करण्यासाठी शेतकरी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करीत आहेत. परंतु, त्यांच्या विनंतीला कुणीही दाद देण्याचे औदार्य दाखवीत नाही. यासंदर्भात लाेकमतमध्ये वृत्त प्रकाशित हाेताच अधिकाऱ्यांनी त्या ट्रान्सफार्मरची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ‘आधी बिले भरा, नंतर दुरुस्ती करू’ अशी सूचना करीत शेतकऱ्यांची बाेळवण केली.
या ट्रान्सफार्मरमध्ये अत्यंत कमी दाबाचा वीजपुरवठा प्रवाहित हाेत असून, त्या विजेवर केवळ बल्ब मिणमिणता पेटताे. त्यामुळे तीन फेजवर चालणारे किमान तीन अश्वशक्ती (हाॅर्स पाॅवर) क्षमतेचे माेटरपंप सुरू हाेत नाहीत. त्यातच कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे माेटरपंप जळण्याची शक्यता असून, त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेते.
या ट्रान्सफार्मरमधून वीजपुरवठा हाेणाऱ्या शेतकऱ्यांकडे विजेचे फारसे बिल थकीत नाही. बहुतांश शेतकरी वीज बिलाचा नियमित भरणा करीत असून, काही शेतकऱ्यांकडे एक-दाेन बिले थकीत आहेत. तरीही महावितरण कंपनीचे अधिकारी ट्रान्सफार्मरची दुरुस्ती टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शाेधून काढत विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. शासन व प्रशासनाची अनास्था शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याची प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.
...
वाकलेले खांब दुरुस्त करणार कधी?
वादळामुळे रामटेक तालुक्यातील बाेरी (पंचाळा फाटा) शिवारातील विजेचे खांब वाकल्याने याही शिवारातील वीजपुरवठा दीड महिन्यापासून खंडित झाला आहे. खांब सरळ करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे अनेकदा केली. त्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयाचे हेलपाटे मारणे सुरू आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाही, असा आराेप शिवदास मदनकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे.
....
पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर
देवरी-बाेर्डा व बाेरी (पंचाळा फाटा) शिवारातील शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीसाठी पऱ्हे टाकले आहे. काही शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. पावसाने दडी मारल्याने या दाेन्ही पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या दाेन्ही शिवारातील वीजपुरवठा खंडित असल्याने तसेच विहिरीत पाणी असूनही ओलित करणे शक्य नसल्याने पऱ्हे व मिरचीचे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यातच विजेअभावी काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली नाही.
...
बाेर्डा शिवारातील ट्रान्सफार्मर बदलवावे लागते. तेथील शेतकऱ्यांना बीज बिल भरण्याची आवाहन केले हाेते. काहींनी बिले भरली तर काहींनी भरली नाहीत. बिले भरली तरच ट्रान्सफार्मरची दुरुस्ती केली जाईल. बाेरी शिवारातील वाकलेले खांब सरळ करण्यात आले.
- आशिष तेजे, उपविभागीय अभियंता,
महावितरण कंपनी, रामटेक