हायकोर्ट : दोन्ही पक्षात आपसी सहमतीने तडजोडनागपूर : पत्नीने स्वत:च्या पतीविरुद्ध केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूर्णविराम दिला आहे. दोन्ही पक्षात आपसी तडजोड झाल्यामुळे यासंदर्भात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित प्रकरण रद्द करण्यात आले आहे.प्रकरणातील माहितीनुसार, कविता व सुनील (काल्पनिक नावे) यांचे १० आॅगस्ट २०१३ रोजी लग्न झाले. यानंतर आपसात पटेनासे झाल्यामुळे कविताने घटस्फोटासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, सुनीलने विवाह कायम ठेवण्यासाठी याचिका केली आहे. दोन्ही याचिका प्रलंबित आहेत. दरम्यान, ३१ जानेवारी २०१४ रोजी कविता महाविद्यालयातून घरी परत जात असताना सुनीलने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. परिणामी कविताने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून सुनीलविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(ड) व ५०६ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला.यानंतर सुनीलने स्वत:ला आरोपमुक्त करण्यासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज सादर केला. ३१ मे २०१५ रोजी न्यायालयाने अर्ज मंजूर केला. या आदेशाविरुद्ध कविताने सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. गेल्या ३१ जुलै रोजी सत्र न्यायालयाने अर्ज मंजूर करून प्रकरण प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडे पुनर्निर्णयासाठी परत पाठविले. या आदेशाला सुनीलने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयात अर्ज प्रलंबित असताना कविता व सुनीलमध्ये तडजोड झाली. दोघांनीही स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा व कौटुंबिक न्यायालयातील याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित प्रकरण रद्द करून दोघांनाही दिलासा दिला.(प्रतिनिधी)
पत्नीने पतीविरुद्ध केलेल्या तक्रारीला पूर्णविराम
By admin | Published: November 02, 2015 2:17 AM