नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये आमदार समीर मेघे व चरणसिंग ठाकूर (दोन्ही भाजप) यांना समन्स जारी करून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
मेघे यांच्याविरुद्ध रमेशचंद्र बंग (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) तर, ठाकूर यांच्याविरुद्ध सलील देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. मेघे यांनी हिंगणा तर, ठाकूर यांनी काटोल विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळविला आहे. त्यांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे.
निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. त्याचे पालन झाले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर २७ दिले गेले नाही. पाच ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यास मान्यता आहे. अनेकांनी याकरिता पैसे भरले. मात्र, व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली गेली नाही, यासह विविध आरोप याचिकांमध्ये करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. आकाश मून यांनी बाजू मांडली.