नागपूर : राज्य शिक्षण मंडळ दहावीचा निकाल १५ जुलैपूर्वी घोषित करेल. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास उशीर होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने बोर्डाला वेळेत निकाल घोषित करण्यास सांगितले आहे.
यावेळी अकरावीच्या प्रवेशासाठी कॉमन इंट्रेन्स टेस्ट (सीईटी) होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी शिक्षण विभागाने सविस्तर दिशानिर्देश दिले. यासंदर्भात दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, बोर्डाने १५ जुलै पूर्वी दहावीचा निकाल घोषित करायचा आहे. सीईटीबरोबरच प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत समितीचे गठण केले आहे. असे असले तरी शिक्षण विभागाने सीईटी ऐच्छिक केली आहे. तरीही यात ९७ टक्के विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. सीईटीचे आयोजन शिक्षण विभागासाठी मोठे आव्हान आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशामुळे बोर्डाच्या विभागीय कार्यालयाद्वारे मूल्यांकनाचे काम जोरात सुरू आहे.
- सीईटीत दहावीचा अभ्यासक्रमाचा समावेश
सीईटीची परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे. सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे मेरीट यादी तयार करण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारेच अकरावीचे प्रवेश होतील. सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. पण ही प्रक्रिया सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर होणार आहे.