दुपारी सभा आयोजित करण्यावर आक्षेप
चिचाळा : गत दीड वर्षात कोरोना प्रतिबंधात्मक नियमामुळे ग्रामीण भागात ग्रामसभांचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र आता ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या नाहीच्या बरोबर असल्याने ग्रामसभांचे आयोजन होत आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार मंगळवारी चिचाळा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही ग्रामसभा दुपारी १ वाजता ठेवण्यात आल्याने चिचाळावासीयांनी याकडे पाठ फिरविली. शेतीच्या कामाचे दिवस असताना दुपारी १ वाजता ग्रामसभा ठेवण्यात आल्यावरून काही ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शेवटी गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली. यासंदर्भात सरपंच मनीषा पडोळे यांना विचारणा केली असता, ग्रामसेवक सुनील तायवाडे यांच्याकडे मालेवाडा आणि चिचाळा या दोन्ही गावाचा कार्यभार आहे. त्यांनी मालेवाडा येथे सकाळी १० वाजता तर चिचाळा येथे दुपारी १ वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते, असे सांगितले. तहकूब ग्रामसभा आता पुढील सात दिवसानंतर घेण्यात येईल, असे पडोळे यांनी स्पष्ट केले.