मंगेश व्यवहारे
नागपूर : ‘निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रियतेच्या योजना लागू करायच्या आणि निवडणूक होताच तो पैसा जनतेवर वेगवेगळे कर लादून वसूल करायचा. याऐवजी राज्याला आर्थिक शिस्त लावायला हवी,’ अशी टीका शनिवारी शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर केली.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंमित दिनी भास्कर जाधव यांनी राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर तसेच बिनखात्याच्या ४१ मंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडून होणाऱ्या आर्थिक शिस्तीच्या अभावावर आणि अनावश्यक खर्चांवर चिंता व्यक्त केली. प्रकल्प, योजना यांवरील खर्च कमी होता कामा नये. यासाठी आर्थिक शिस्त आणण्याची गरज आहे. तसेच पुरवणी मागण्यासंदर्भात गोडबोले समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, पुरवणी मागणी या अर्थसंकल्पाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. परंतु, सरकारने पुरवणी मागण्यांची मर्यादा ओलांडत वीस टक्क्यांपर्यंत नेली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.’ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी दिलेल्या उत्तरामुळे मंत्री धनंजय मुंडे आज सभागृहात अवतरले असावेत, असा टोला त्यांनी लगावला.
- सरकारमध्ये ४१ बिनखात्याचे मंत्री
विद्यमान सरकारने ४१ बिनखात्याचे मंत्री अधिवेशनकाळात काम करत असल्याचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. अगदी दोन उपमुख्यंत्रीसुद्धा बिनखात्याचे आहेत. एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कारभार चालवित आहेत. सरकारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले की ते लोकशाहीला मारक असते. त्यामुळे सत्तापक्ष मुजोर बनतो. तसे चित्र सध्या दिसून येत आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.