लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतातील वीज तारा तोडून त्यांची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. ठाणाविहिर, ता.अक्कलकुवा येथे देखील असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विद्युत कायदा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, ठाणाविहीर शिवारातील दिनकर खेत्या नाईक यांच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील तारा तोडून विद्युत पुरवठा खंडित केला. यामुळे त्यांच्या शेतापुढील शेतकऱ्यांना वीज समस्येला सामोरे जावे लागले. याबाबत वीज कंपनीचे सहायक अभीयंता नरेश कोचरा यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनापरवाणगी विद्युत तारा तोडणे, वीज पुरवठा खंडित करणे यासह विद्युत कायदा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मानसिंग नावडे करीत आहे. दरम्यान, शेत शिवारातून वीज तारा तोडून त्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक दिवस विना वीज जोडणीचे राहावे लागते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
विद्युत तारा तोडून केले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 1:13 PM