लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील आष्टे शिवारातील सर्व्हे नंबर ८/१, सात एकर, ८/२ मध्ये पाच एकर तर ९/२ मधील पाच एकर, असा एकूण १७ एकर ऊस व ठिबक सिंचनच्या नळ्या जाळल्याने संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून अशा अज्ञात माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत असे की, २१ रोजी आष्टे शिवारातील ऊस पिकास आग लागल्याचे चित्र तरुणांना दिसताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या घटनेबाबत मोड येथील शेतकरी रेखाबाई भरत चौधरी व लीलाबाई पाटील यांनी सातपुडा साखर कारखान्याचे एम.डी. पी.आर. पाटील यांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी तत्काळ कृषी अधिकारी सावन पाटील, मोड केंद्रातील जाधव पाटील व भरत पाटील यांना घटनास्थळी पाठवून नुकसानीचा पंचनामा केला. या वेळी त्यांनी जळालेल्या उसाची तोड करण्याकरिता मजुरांच्या तीन टोळ्या आणून तत्काळ उसाची तोड सुरू केली आहे. दरम्यान या उसाची संबंधित शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडे नोंद केली होती. त्यामुळे त्याची तत्काळ तोड सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तसेच संजय शिंदे यांनी त्यांच्या उसाची नोंद पुष्पदंतेश्वर कारखान्यात केली असल्याने पुष्पदंतेश्वर कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या शेतातील उसाचा पंचनामा केला असून, त्यांच्याही उसाची लवकरच तोड करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या नियमानुसारच संबंधित शेतकऱ्यांना पेमेंट मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. या आगीच्या घटनेमुळे रेखाबाई भरत चौधरी व लीलाबाई भरत पाटील व संजय डाेंगर शिंदे या शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करावा व रात्रीच्या वेळेस परिसरातील शेतशिवारात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
मोड येथील शेतकऱ्यांचा 17 एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 3:10 PM