लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचे दररोजचे रुग्ण वाढतच असून यामुळे जिल्हावासीयांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा सात हजार पार झाला आहे. दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण घटले आहे. सद्या जिल्हा रुग्णालयात तसेच शहादा येथे उपचार कक्ष सुरू आहेत. दरम्यान, विविध अटी व नियमांमध्ये शिथीलता आल्याने नागिरकांमध्ये बेफिकीरपणा वाढला असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात ॲाक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात बाधितांची संख्या कमालीची रोडावली होती. त्यामुळे हायसे वाटले होते. परंतु दिवाळीच्या काळात प्रवासी संख्या वाढली. खरेदीसाठी नागरिक बाहेर निघाले. एका गावाहून दुसऱ्या गावात सण, उत्सवामुळे झालेले स्थलांतर यामुळे संसर्ग वाढला. त्याचे परिणाम दिवाळीनंतर आठ दिवसांनी दिसू लागले. पूर्वी दिवसभरात केवळ आठ ते २० रुग्ण बांधीत आढळून येत होते. त्यांची संख्या नंतर २० ते ५० पर्यंत जाऊ लागली आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.उपचार कक्ष बंदकोरोनाचे संक्रमण अधीक प्रमाणात होते त्यावेळी तालुका स्तरावर अर्थात नंदुरबार येथे दोन, शहादा, तळोदा, नवापूर येथे प्रत्येकी एक उपचार कक्ष सुरू होते. आताच्या स्थितीत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात एक व शहादा येथे एक असे दोनच शासकीय उपचार कक्ष सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील उपचार कक्षावर ताण पडू लागला आहे. याशिवाय अनेक डॅाक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती इतरत्र करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची संख्येचाही परिणाम दिसून येत आहे. शासनाने विविध बाबींवर शिथीलता आणली असल्याने नागरिकांमधील बेफिकीरपणा वाढला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आवश्यक ती खबरीदार घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये आवश्यक ते नियम पाळणे आवश्यक आहे. बाजारात फिरतांना देखील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महिनाभरात ८२० रुग्ण... नोव्हेंबर महिन्यात ५०० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले होते. डिसेंबर महिन्यात मात्र तब्बल ८२० रुग्ण आढळून आले आहेत. महिनाअखेर ही संख्या हजाराचा टप्पा पार करेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. बाधितांच्या संपर्कातील अधिकाधिक लोकांची चाचणी करणे आवश्यक आहे. संपर्क साखळी तोडण्यावरही भर द्यावा.
बरे होण्याचेही प्रमाण चांगले डिसेंबर महिन्यात ज्या प्रमाणात रुग्ण वाढले त्या प्रमाणात बरे देखील झाले आहेत. १ ते २६ डिसेंबर या दरम्यान ७८५ रुग्ण बरे झाले आहेत. त्याची टक्केवारी ९३ टक्केपेक्षा अधीक आहे. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रुग्णांवर उपचार सुरू असून त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
११ जणांचा झाला मृत्यू : जिल्ह्यात २६ दिवसात अर्थात डिसेंबर महिन्यात एकुण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ४० ते ७० वर्ष वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.