लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार कमावण्यासाठी गुजरात राज्यात स्थायिक झालेल्या कामगारांना वाहून नेणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे गुजरातमधून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. उधना-जळगाव रेल्वेमार्गामुळे खान्देशासह विदर्भ आणि उत्तर भारतातील लाखो कामगार, मजूर व नोकरदार गुजरातमधील मोठ्या शहरात स्थिरावले आहेत. परंतू वर्षात किमान एकदा तसेच विविध सण, समारंभ आणि विवाह सोहळ्यांसह दु:खद प्रसंगाने हे नागरीक मूळ गावाकडे नक्की येतात. यासाठी त्यांना सुरत-भुसावळ या पॅसेंजर गाडीचा सर्वात मोठा आधार होता. यामुळे पॅसेंजर गाड्यांना वर्षभर गर्दी राहत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चनंतर या गाड्या बंद आहेत. कधी सुरू होणार याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली नसल्याने प्रवाशांचे हाल पुढेही सुरू राहणार आहेत.
खान्देश एक्सप्रेस बंद भुसावळ ते बांद्रा टर्मिनस असा प्रवास करणारी खान्देश एक्सप्रेसही बंद आहे. यातून मुंबई येथे जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरीकांना रस्ता मार्गाने प्रवास करावा लागत आहेत. सोबतच अमरावती-सुरत पॅसेंजर बंद असल्याने विदर्भातून प्रवास करणा-यांचे हाल होत आहेत.
सुरत-भुसावळ पॅसेंजरला सर्वाधिक पसंती भुसावळ ते सुरत दरम्यान दिवसभरात आठ पॅसेंजर गाड्यांच्या फे-या होत होत्या. यातील प्रत्येक फेरीत प्रवाशांची गर्दी कायम होती. आठ महिन्यापासून या फे-या बंद असल्याने सुरत हून खान्देशात येणारे खाजगी वाहने व बसेसचा आधार घेत आहेत.
गोरगरीबांना मोठा आर्थिक फटका पॅसेंजर गाडीचे तिकीटाचे दर एसटी किंवा खाजगी वाहनापेक्षा अल्प आहेत. यातून त्यांचा कुटूंबासह गावापर्यंतचा प्रवास कमी खर्चात होत होता. परंतू पॅसेंजर गाड्या बंद असल्याने त्यांना जादा दराने तिकीटे काढून विशेष हिवाळी गाड्या आणि एसटीने प्रवास करावा लागत आहे. यातून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्य व केंद्र सरकारने पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या वर्षात याबाबत निर्णय घेवू शकतात. गजेंद्र शिंपी, अध्यक्ष, प्रवासी संघटना