लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येत्या वर्षात १२० कोटी रूपयांच्या कामांचे उद्दीष्ट्य जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. तत्पश्चात यंदाच्या वर्षात मात्र रोजगार हमी योजना स्थलांतरीतांच्या लाभाची ठरत असून लाॅकडाऊनमुळे कामधंदा सुटलेल्या गुजरात राज्यातील स्थलांतरीतांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून गुजरात राज्यातील महानगरांमध्ये मिळेल ते काम करण्यासाठी मोठ्या संख्येने युवक जातात. काही जण याचठिकाणी स्थिरवतात तर काही जण वर्षातून दोन वेळा हंगामी म्हणून जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे या दोन्ही घटकांना तोटा झाला होता. वर्षानुवर्षे राहून सुरत, अहमदाबाद, बडोदा, वापी यासह विविध शहरात बस्तान बसवलेले काम बंद झाल्याने घरी परत आले होते. येथे मजूरी करुन उपजिविका भागवावी असे धोरण त्यांचे होते. परंतू अपयश आल्याने शेवट त्यांनी रोहयोच्या कामांमध्ये नाव नोंदणी करुन कामाला सुरूवात केली होती. यातून काम मिळत गेल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील विविध भागात सध्या हे मजूर रोहयोच्या कामांवर जात असल्याची माहिती समोर आले आहेत.
वर्षात रोहयोची कामे वाढली गेल्या वर्षी ६७ कोटी रूपयांचे उद्दीष्ट्य रोजगार हमी योजनेत देण्यात आले होते. यांतर्गत रस्ताकाम, रोपवाटिकांची लागवड, मजगी, सीसीटी आदी कामे करण्यात आली होती. याकामांमुळे रोजगार निर्मिती झाली होती. याच कामांना पुढे नेत प्रशासनाने धडगावसह विविध तालुक्यात रोपवाटिका तयार करणे, रस्ते तयार करणे तसेच दुर्गम भागात विविध कामांना प्राधान्याने सुरूवात करण्यात आली आहे.
९८६ रोहयोची कामे जिल्ह्यात सुरू आहेत
४६६७ रोह्योवर सध्या कार्यरत मजूर
१२०० मागील वर्षी नोव्हेंबरमधील कामे
गुजरात राज्यात कामाला होतो. लाॅकडाऊनमध्ये हातून काम गेले. म्हणून मग गावी परत आलो. याठिकाणी रोहयोंतर्गत मजूर म्हणून नोंदणी केली. जाॅबकार्ड तयार करुन कामांना सुरूवात केली आहे. १०० दिवस पूर्ण केले आहेत. - काशिनाथ गुलाब ठाकरे, रांझणी ता. तळोदा
गुजरातमध्ये कामाला होतो. परत आल्यानंतर काय करावे हेच सुचत नव्हते. कुटूंबातील सदस्य आणि मित्रपरीवाराने मदत करुन रोहयोमध्ये नोंदणी करुन दिली. यातून रोजगार मिळाला आहे. मिळणा-या रोजगारातून कुटूंबाचे पालनपोषण होत आहे. -कालूसिंग मंगा वळवी, रांझणी ता. तळोदा